महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेची बाजू नेहमीच हिरिरीने मांडणारे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीसंदर्भात “इनफ इज इनफ’ या शब्दांमध्ये एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्थात ही प्रतिक्रिया व्यक्त करताना आता शिवसेना गप्प बसणार नाही, झालं ते पुरे झालं, या संदर्भात ती प्रतिक्रिया असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडत आहेत त्या पाहता राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनीही “इनफ इज इनफ’ अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली, तर आश्चर्य वाटायला नको. कारण कोणत्याही परिपक्व राजकारणाला न शोभणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडत आहेत आणि केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपण राजकारणाची किती खालची पातळी गाठत आहोत याची कल्पना कोणत्याच राजकीय पक्षाला येत नसल्याने हा संपूर्ण गोंधळ निर्माण झाला आहे. अमरावतीतील नेते रवी राणा आणि त्यांची पत्नी नवनीत राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात ज्याप्रकारे सर्वत्र राजकीय हालचाली सुरू झाल्या आणि
शिवसेनेचा युवा कार्यकर्ता ज्याप्रकारे आक्रमक झाला ते अपेक्षित असले, तरी शनिवारी ज्या घटना घडल्या त्या निश्चितच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभणाऱ्या नव्हत्या. ज्या प्रकारे मुंबईची पोलीस यंत्रणा शनिवारी दिवसभर विनाकारण एका बिनमहत्त्वाच्या विषयासाठी वेठीस धरण्यात आली ते पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील इतर सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते आणि महाविकास आघाडी प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी बाकावर बसणारे देवेंद्र फडणवीस या सर्वांनाच आता गांभीर्याने या घटनांचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सतत केला जात आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी जो विषय उपस्थित केला होता त्याची परिणीती म्हणजे त्यांना अटक करण्यात झाली; पण ज्या प्रकारे शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील
निवासस्थानाबाहेर आणि अमरावतीच्या निवासस्थानाबाहेर घेराव घालून एक प्रकारचे दहशतीचे वातावरण तयार केले होते ते पाहता सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे वर्तन करावे की न करावे, हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना अटक करून हा हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संशय असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. साधारण अशाच प्रकारची घटना शनिवारी घडत असताना अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे वास्तव महाराष्ट्रातील सर्व जनतेने पाहिले. दुसरीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा भेटण्यासाठी आलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात येऊन त्या दगडफेकीमध्ये किरीट सोमय्याही जखमी झाल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांनी दाखवल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे निवास स्थान असणारे मातोश्रीकडे कोणी डोळे वटारून पाहिले तर आम्ही अशाच प्रकारची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करू असा संदेश देण्याचे काम शनिवारच्या या घटनेतून झाले असले, तरी त्यामुळे एक नकारात्मक संदेशही गेला आहे, हे विसरून चालणार नाही.
जणूकाही जगातील सर्व समस्या संपल्या आणि आता कोणती समस्या संपवण्याचे काम बाकी राहिले नाही अशा अविर्भावात सर्व राजकीय पक्ष वावरत असल्याने ही एक गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे. एकीकडे महागाईने टोक गाठले असतानाच आणि दुसरीकडे देशात आणि महाराष्ट्रात करोना महामारीसुद्धा पुन्हा एकदा वाढण्याची भीती व्यक्त होत असतानाच त्याचे कोणतेच गांभीर्य ना राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे ना त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. क्रियेला प्रतिक्रिया देताना, उत्तराला प्रत्युत्तर देताना आणि कुरघोडी करण्याच्या नादात आपण राजकारणाची किती हीन पातळी गाठत चाललो आहोत याची कल्पना कोणालाही नाही. ज्या महाराष्ट्रातील राजकारणाचा आदर्श आतापर्यंत इतर राज्यांत घेतला जात होता त्याच महाराष्ट्रात इतके द्वेषाचे आणि सुडाचे राजकारण कोणीही कधीही पाहिले नसेल. केंद्रीय पातळीवरील तपास संस्थांनी गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनिल देशमुख, नवाब मलिक यासारख्या नेत्यांवर कारवाई करून त्यांना गजाआड केले असल्याने त्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात त्याच प्रकारचे धोरण राबवण्याचे काम राज्य पातळीवरही होत आहे, असेच दिसून येते.
एकमेकांवर कुरघोड्या करून एकमेकांवर मात करण्याच्या या राजकारणामध्ये महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. सर्वच राजकीय पक्षांची प्रतिमा दिवसेंदिवस जास्तच मलिन होत चालली आहे, याची काळजी कोणत्याच राजकीय पक्षाला नाही. हा राजकीय गोंधळ आता पुरे झाला, अशी आर्त हाक राज्यातील सर्वसामान्य मतदारांनी दिली असेल, तर त्याचे गांभीर्य सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांनीही ओळखायला हवे. ज्या विषयांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांशी कोणताही संबंध नाही ते विषय विनाकारण समोर आणून एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे हे महाराष्ट्रातील विद्यमान राजकारण निश्चितच चुकीचे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला वेळीच लगाम घातला नाही तर महाराष्ट्रासारखे राज्य केवळ देश पातळीवर नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही बदनाम झाल्याशिवाय राहणार नाही.