मुंबई – वर्ल्ड एक्स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली असून 15,260 कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे. या माध्यमातून दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सामंजस्य करारात जपान, सिंगापूर, स्वीडन, कोरिया, जर्मनी, इटली या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाईल, डेटा सेंटर, औषध निर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू ई. विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यासह आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
दि. 01 ऑक्टोबर, 2021 ते 31 मार्च, 2022 या कालावधीत दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये 190 देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील उद्योजक/गुंतवणूकदार, शासकीय विभाग सहभागी झाले आहेत.