पिंपरी – राज्याकडून कोळशाचे पैसे थकले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र गेले कित्येक महिने केंद्र सरकारने जीएसटीची रक्कम राज्य सरकारला दिली नाही. त्या थकबाकीचे काय असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला आहे.
आकुर्डी येथे पत्रकाराशी बोलताना त्यांनी देशातील कोळसा प्रश्नाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, कोळशाच्या साठ्याबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपले मत मांडले. महाराष्ट्राकडून कोळशाचे तीन हजार कोटी रुपयांचे येणे आहे, महाराष्ट्र सरकारकडून ते पैसे आले नाही म्हणून केंद्र सरकारची अडचण झाली असल्याचे दानवे यांनी सांगितले.
कोळशाचे पैसे थकले हे खरे आहे. 3 हजार कोटी रुपयांपैकी 1400 कोटी रुपये देण्याची व्यवस्था मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी केली आहे. ते पैसे दोन दिवसांत केंद्राला जातील. मात्र राज्याचे जीएसटीची 35 हजार कोटी रुपये थकले आहेत त्यावर देखील केंद्रीय मंत्र्यांनी बोलावे.