– हिमांशू
कोणत्याही बाबतीत कोंडी होणं, पेच निर्माण होणं आपल्या देशातल्या लोकांना नवीन राहिलेलं नाही. वाहतुकीच्या कोंडीला आपण दररोज सामोरे जातोच. रोजच्या रस्त्यावर नेमक्या कुठल्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, हे एकदा हेरलं की चतुर लोक त्यातून मार्ग काढायला सुरुवात करतात किंवा पर्यायी रस्ते निवडतात.
अर्थात, त्यामुळे कोंडी संपत नाही. आपल्याकडे रस्त्यापासून कोंडीला सुरुवात होते आणि संसदेत कोंडीचा परमोच्च बिंदू पाहायला मिळतो. काहीही झालं तरी कामकाज होऊ द्यायचंच नाही, असा प्रयत्न दोन्ही बाजूंनी थोडे दिवस झाला, की अधिवेशनाचं सूप वाजतं. अर्थात, जी विधेयकं मंजूर होणारच असतात ती होतातच! परंतु अनेक बाबतीत सस्पेन्स कायम ठेवूनच अधिवेशन संपतं आणि नागरिकांच्या डोक्यात प्रश्नांची कोंडी निर्माण होते.
नुकत्याच संपलेल्या (किंवा संपवलेल्या) पावसाळी अधिवेशनातसुद्धा 20-30 टक्केच कामकाज झालं. कोंडीचे अनेक प्रकार आपल्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पाहायला मिळतात. काही वेळा ही कोंडी “झालेली’ असते तर काही वेळा “केलेली’ असते.
परंतु आजकाल सर्वाधिक जीव कासावीस करणारी कोंडी म्हणजे ट्विटर अकाउंट “ब्लॉक’ होणं! संवादासाठी तेवढं एकच माध्यम उरलंय, अशा आविर्भावात असलेल्या नेतेमंडळींच्या घुसमटीची माध्यमांत चर्चा होते आणि ज्या अत्याचारित मुलीची ओळख पटल्यामुळे हे घडलं तिचं पुढे काय झालं, यावरील चर्चा मात्र थांबते.
असो! आज मात्र एका अनोख्या कोंडीची माहिती समोर आलीय. सर्वसामान्यांच्या जीवनातसुद्धा एवढा “ट्विस्ट’ येऊ शकतो, हे पाहून मनात कालवाकालव झाली. लग्न, संसार आणि मग संन्यास असा घटनाक्रम एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात घडला तर अशी विचित्र कोंडी होणं स्वाभाविकच आहे. घटना आहे झारखंडमधली.
तब्बल बावीस वर्षांपूर्वी संन्यास घेतलेला एक गृहस्थ भिक्षा मागण्यासाठी स्वतःच्याच घरासमोर उभा राहिला. इतक्या वर्षांनंतर आपल्याला कुणी ओळखणं शक्य नाही, असं त्याला वाटलं होतं आणि ते बरोबरही होतं. कारण त्याचा मृत्यू झालाय, असं कुटुंबीयांनी गृहित धरलं होतं. त्याची बायको काही दिवसांसाठी माहेरी गेली आणि नंतर पुन्हा सासरी येऊन शेती करू लागली.
नवऱ्यानं कुणाला न सांगता घर सोडलं तेव्हा मुलगा तीन वर्षांचा होता आणि मुलगी एका वर्षाची. आता ती मोठी झालीत. आईनेच त्यांना वाढवलं, शिकवलं. इतक्या वर्षांनंतर त्यांनी वडिलांना ओळखणं शक्यच नव्हतं. पण पत्नीनं बरोबर ओळखलं आणि भिक्षा मागणाऱ्या साधूकडे पाहून ढसढसा रडू लागली. गावातले लोक जमले. त्यातल्याही काही जुन्या मंडळींनी या संन्याशाला ओळखलं. आता त्यानं गाव आणि घर सोडू नये, यासाठी सगळं गाव प्रयत्न करू लागलंय.
आता यात कोंडी कुठंय? मुळात संन्याशाला आपलं घर ठाऊक असूनसुद्धा तो तिथेच भिक्षा मागायला कसा गेला? या प्रश्नात कोंडी लपलीय. त्याच्या गुरूनं त्याला सांगितलंय, की पत्नीच्या हातून भिक्षा घेतल्याशिवाय तुला सिद्धी प्राप्त होणार नाही. आता पत्नी तर त्याला भिक्षा द्यायला तयार नाही. मग याला सिद्धी कशी मिळणार? संसार आणि संन्यासाच्या उंबरठ्यावरचा हा साधक भिक्षा घेतल्याशिवाय गावही सोडू शकत नाहीये. आहे ना खरोखर कोंडी?