पुणे – राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये करोना नियंत्रणात आला आहे त्या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमधील निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल मात्र ज्या जिल्ह्यात करोनाचे बाधित काही प्रमाणात वाढ दर्शवित आहे तेथील निर्बंधामध्ये वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी दिले. ( CM Uddhav Thackeray Live )
मुख्यमंत्र्यांच्या संकेतामुळे पुणे जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी शेतीच्या कोणत्याही कामावर लॉकडाऊनचे निर्बंध असणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. 12वीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ असे सांगताना त्यांनी केंद्र सरकारने याबाबत देशव्यापी धोरण आखण्याची गरज व्यक्त केली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी दूरदृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी त्यावर यश मिळाविण्यात आलेले नाही असे स्पष्ट केले. ( CM Uddhav Thackeray Live )
ते म्हणाले गेल्या वर्षी ही लाट शिखरावर असताना जेवढी सरासरी रूग्णसंख्या होती तेवढीच रूग्णसंख्या आज दिसत आहे. गेल्यावर्षी 17 ते 19 सप्टेंबर या काळात 24 हजार 886 एवढे सरासरी नवे बाधित सापडत होते. 26 मे रोजी 24 हजार 752 नवे बाधित सापडले.
याचाच अर्थ आपण करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी त्यावर मात करण्यात अद्याप यशस्वी ठरलो नाही. त्यामुळे आगामी काही काळ निर्बंध कायम ठेवावे लागतील अन्यथा चावीवाल्याप्रमाणे कुलूप बंद कुलूप उघडणे एवढेच काम आपल्याला करावे लागेल.
12वीचे धोरण केंद्राने ठरवावे
10वीचे परिक्षा घ्यायच्या नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतला परिक्षा न घेता मूल्यांकन करून मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 12वीच्या परिक्षांबाबत आम्ही आढावा घेत आहोत मात्र 12वीच्या परिक्षांवर मुलांचे पुढील भवितव्य अवलंबून असते त्यामुळे त्याबाबतचे धोरण केंद्र सरकारने ठरविण्याची गरज आहे. एका राज्याने परिक्षा घेतली दुसऱ्या राज्याने घेतली नाही तर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एकच धोरण असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षणासाठी नवे धोरण
गेल्या वर्षी 2020मध्ये करोनाची साथ सुरू झाली त्यावेळी 2021 करोनामुक्त असेल अशी भावना निर्माण झाली होती. मात्र 2021मध्येही करोनाची दुसरी लाट आली त्याची भीषणता पहिल्या लाटेपेक्षा अधिक होती त्यामुळे यापुढे जर लाट आली तर शिक्षणाची व्यवस्था कशी करायची याबाबत क्रांतीकारक निर्णय घ्यावे लागतील. सध्या “वर्क फॉम होम’ सुरू आहे. तसेच काही शिक्षणाबाबत करता येईल याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करत आहोत त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. ( CM Uddhav Thackeray Live )
करोनामुक्त गाव
माझा घर माझी जबाबदारी या मोहिमेत राज्यातील जनतेनेमुळे यश मिळाले तशीच आता माझे गाव करोनामुक्त ही नवी मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिवरेबाजार हे पोपटराव पवार यांनी करोनामुक्त केले आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील दोन गावे तरूण सरपंचानी करोनामुक्त केली आहे. माझे घर करोनामुक्त असा निर्धार करून वर्तन ठेवल्यास गाव करोनामुक्त होईल त्यातून तालुका, जिल्हा आणि राज्य करोनामुक्त होईल त्यातून अन्य राज्यांनी प्रेरणा घेतल्यास देश करोनामुक्त होईल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
शेती आणि पुरक व्यवसायांना सवलती
देशातील बळीराजा जर आजारी पडला तर संपूर्ण देश आजारी पडेल देशाची अर्थव्यवस्था आजारी पडेल याचे भान बाळगणे गरजेचे आहे त्याचवेळी अन्नदात्यांच्या हंगामाची गरज लक्षात घेऊन शेतीचे व्यवहार थांबवून देणार नाही. खते, बियाणे, अवजारे यांची दुकाने सुरू ठेवण्यात येतील त्यावर वेळेचे काहीसे बंधन असेल. शेतमजूरांच्या आवक-जावक वाढल्याने वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोठेही गर्दी होऊ न देता करोनाची नियम पाळून आपले व्यवहार सुरू ठेवावेत असा सल्ला ठाकरे यांनी दिला.
विरोधकांवर टिका
दुसरी लाट नियंत्रणात येताना आता हे सुरू करा ते सुरू करा अशी हाकाटी पिटत काही जण आंदोलन सुरू करतील. पहिली लाट ओसताना अशा स्वरूपाच्या आंदोलनाने दुसऱ्या लाटेला आमंत्रण मिळाले आहे आहे त्यामुळे कृपा करून या गोष्टी करू नका. तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी रस्त्यांवर उतरू नका असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
निराधार बालकांचे पालकत्व
करोनाच्या साथीत काही जणांची बालके दगावली तर काही बालकांचे पालक त्यांना सोडून गेले. त्यामुळे अनाथ झालेल्या या मुलांचे पालकत्व राज्य सरकार स्विकारणार आहे. त्यांना कोठेही कमी पडून देणार नाही त्यासाठी त्यांचे शिक्षण, राहण्याची सोय, जेवणाची सोय याची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच धोरण आखण्यात येणार आहे. या मुलांना जिथे गरज लागेल तेथे मदत पुरविण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
करोनाच्या काळात मदतीचा आढावा
करोनाच्या काळात गरीबांना 2 लाख 74 हजार टन धान्य राज्य सरकारकडून देण्यात आले. दुसऱ्या लाटेच्या काळात 2 लाख 54 हजार शिवभोजन थाळ्या देण्यात आल्या. श्रावणबाळ निवृत्ती योजनेमार्फत 850 कोटी रूपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले. 10 लाख बांधकाम मजूरांच्या खात्यावर 154 कोटी 95 लाख रूपये जमा केले. फेरीवाल्यांना 52 कोटी रूपयांची मदत केली. जिल्हाधिकाऱ्यांना 3 हजार 865 कोटी रूपये उपलब्ध करून दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
निर्बंध लादणे हे कटूकृत्य
आपल्यावर कुटूंबियांनाप्रमाणे राज्यातील जनता करत आहे त्या जनतेवर निर्बंध लादणे हे योग्य वाटत नाही पण त्याला पर्याय नाही. घरातील व्यक्तींवर असे निर्बंध लादणे हे सर्वात कडू कृत्य आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
परिस्थिती सुधारणा
गेल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली अपेक्षेपेक्षा खूप कमी वेळेत ही संख्या वाढली. त्याचा ताण सरकारवर आला. मात्र यावेळी बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के झाले आहे. गेल्या लाटेत ते प्रमाण 78 टक्के होते. मृत्यूदर गेल्या लाटेत 2.65 टक्के होता. तो या लाटेत 1.65 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश आले आहे.