भारतासह जगाला गेल्या वर्षभराच्या कालावधीत त्रस्त करून सोडणाऱ्या करोना महामारीच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दोन दिवसांपूर्वी तर भारतात रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला. जगात सर्वात जास्त रुग्ण वाढ आता भारताच्या नावावर नोंदवली गेली आहे. एकीकडे अशीही भीतीदायक आकडेवारी समोर येत असतानाच दुसरीकडे ऑक्सिजनची टंचाई, लसींची टंचाई आणि रुग्णालयामधील बेडची टंचाई या नकारात्मक गोष्टी समोर येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घबराट पसरली असल्यास नवल नाही. एकूणच सर्व परिस्थिती निश्चितच भीषण असली तरी समाजातील सर्वच घटकांनी या परिस्थितीमध्ये घबराट जास्त पसरून लोकांची मानसिकता कमकुवत होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. विशेषत: देशातील विविध माध्यमांच्या मार्फत करोनाबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे तर ही घबराट वाढण्याची पातळी जास्त तीव्र होत आहे हे नाकारून चालणार नाही.
सर्वोच्च न्यायालयालाही आता या प्रकरणाची दखल घ्यावी लागली असून करोनाबाबतची अधिकृत माहिती फक्त सरकारकडूनच जारी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच कुठे ऑक्सिजनची गळती होऊन रुग्णांचा झालेला मृत्यू असो किंवा मुंबईमध्ये हॉस्पिटलला आग लागून रुग्णांचा झालेला मृत्यू असो किंवा राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने 25 पेक्षा जास्त रुग्णांचा झालेला मृत्यू असो अशा प्रकारच्या बातम्यांचे प्रमाणच जास्त प्रमाणात समोर आल्याने सामान्य नागरिकांची मानसिकता नकारात्मक झाली असल्यास त्यात त्यांचा दोष मानता येणार नाही. अधिकृत प्रसारमाध्यमे सर्व प्रकारची काळजी घेऊन वृत्तांकन करत असतात; पण सर्वसामान्य नागरिकांच्या हातात जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनवर जो सोशल मीडिया नावाचा प्लॅटफॉर्म सक्रिय झाला आहे त्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या खऱ्या आणि बरोबर किंवा अचूक असतात असे नाही. तरीही समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या या बातम्या, विविध प्रकारचे व्हिडिओ, विविध तज्ञांचे मत यावर लोक विश्वास ठेवतात आणि ही सर्व माहिती आहे तशी इतर समाज माध्यमांमध्ये फॉरवर्ड केली जाते.
ही माहिती किती अचूक किंवा उपयुक्त आहे याचा विचार न करता त्यावर विश्वास ठेवला गेल्यानेच घबराट जास्तच वाढते हे विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे अधिकृत प्रसारमाध्यमात सर्व गोष्टींचा विचार करून आणि खातरजमा करून बातम्या प्रसिद्ध करतात त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपण जो मेसेज फॉरवर्ड करणार आहोत त्याची खात्री करून जर तो फॉरवर्ड केला तर अफवा पसरण्यास आणि त्या माहितीमुळे निर्माण होणाऱ्या भीतीला आळा बसू शकेल. अर्थात, विविध अधिकृत प्रसारमाध्यमे असोत किंवा समाज माध्यमे असोत त्यांनी जरी आपापली जबाबदारी अशा प्रकारे पार पाडली तरी या सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांमधील घबराट जास्त वाढणार नाही हे जरी खरे असले तरी यासाठी सरकारी पातळीवरही काहीतरी करण्याची गरज आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक पातळीवरील महानगरपालिका अथवा नगरपालिका असोत सर्वांनीच आता राजकारण बाजूला ठेवून या परिस्थितीकडे गांभीर्याने बघावे लागणार आहे. देशाचे पंतप्रधान किंवा संबंधित राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा आपल्या जनतेशी संवाद साधतात तेव्हा जनतेच्या मनात कोणत्या प्रकारची नकारात्मक भावना निर्माण होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावीच लागेल.
भारतासारख्या महाकाय देशामध्ये लोकसंख्येचा दबाव मोठ्या प्रमाणात असल्याने ऑक्सिजनची टंचाई असो किंवा लसींची टंचाई हे गृहीत धरावे लागणार होते. सरकारला या टंचाईची कल्पना नसल्यानेच सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या भारतामध्ये सर्वांनाच करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस द्यायचे असतील तर त्यासाठी किती मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करायला हवे ही गोष्ट यापूर्वीच लक्षात यायला हवी होती; पण तसे होऊ शकले नाही. सरकारचे नियोजन चुकल्यानेच या आरोग्यविषयक यंत्रणेतील सर्व टंचाईच्या बातम्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समोर येत असल्याने ही घबराट आणि नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
ही परिस्थिती संपेल आणि सर्व नागरिकांना लस उपलब्ध होईल आणि कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजनवाचून जीव गमवावा लागणार नाही, अशा प्रकारचा विश्वास आता सरकारला सामान्य माणसांच्या मनात निर्माण करावा लागेल सरकारच्या हातात जी विविध माध्यमे आहेत त्या सर्व माध्यमांचा प्रभावी वापर करून सरकारने लोकांच्या मनातील घबराट कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत सध्या लोकसंख्येचा जो भाग करोना पासून मुक्त आहे त्या लोकांना आपल्याला जर करोनाची लागण झाली तर आपल्याला सर्व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतील की नाही याबाबत शंका असल्यानेच ही घबराट वाढत चालली आहे.
भारतात दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत चालली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही त्यापेक्षा जास्त आहे हे विसरून चालणार नाही आणि याच गोष्टीवर आता भर देण्याची गरज आहे. जोपर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी मास्कचा वापर करणे हे एक प्रकारे लस घेतल्यासारखेच आहे. हा नियम सर्वांच्या मनात बिंबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी काळात करोना रुग्णांची संख्या अशाच प्रकारे वाढत चालली तर आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व असा ताण निर्माण होणार आहे.
हे लक्षात घेऊनच सरकारला आता हालचाली कराव्या लागतील सर्वसामान्य नागरिकांनी मूलभूत नियमांचे पालन करताना आपली मानसिकता जर कणखर ठेवली तर या परिस्थितीवर निश्चित मात करता येऊ शकेल. त्यामुळे ऑक्सिजनची टंचाई किंवा बेड उपलब्ध नसणे किंवा लसींची टंचाई अशा प्रकारच्या माहितीचा आणि बातम्यांचा मारा करण्यापेक्षा जर करोनावर मात करून सुखरूपपणे बाहेर आलेल्या रुग्णांच्या बातम्यांनी सकारात्मक वातावरण निर्माण केले तरच ही घबराट कमी होऊ शकेल.