नगर – मुंबईत काळ्याबाजारात विक्रीसाठी चाललेला 6 लाख 45 हजार रूपये किंमतीचा 600 गोण्या तांदूळ स्थानिक गुन्हे शाखेने आज पकडला. नगर -जामखेड रस्त्यावरील छावणी परिषदच्या बंद टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोघांना पोलिसांनी जेरबंद केले असून दोन जण पसार आहेत.
कृष्णा गोविंद ढाकणे (वय 31), विवेक रामभाऊ ढाकणे (वय 19, दोन्ही रा. धनगरवाडी, दोहीठाण, ता. आष्टी, जि. बीड) या दोघांना ताब्यात घेतले असून प्रकाश धनराज तोतला, पवन प्रकाश तोतला (दोन्ही रा. वंजारगल्ली, जि. बीड) हे पसार आहेत. या चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, मनोहर गोसावी, सचिन आडबल, रणजीत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बीड येथून एका ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात येत आहे.या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने नगर- जामखेड रस्त्यावरील छावणी परिषदेच्या बंद असलेल्या टोलनाका येथे सापळा रचला. गुन्हे शाखेच्या पथकाने एका ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक थांबविला. ट्रकमधील व्यक्तींनी त्यांची नावे कृष्णा गोविंद ढाकणे व विवेक रामभाऊ ढाकणे अशी असल्याचे सांगितली.
ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये तांदळाच्या गोण्या दिसल्या. ट्रकमधील व्यक्तींनी हा तांदूळ प्रकाश तोतला व पवन तोतला यांच्या मालकीचा असल्याचा सांगितले, बीड एमआयडीसी येथील महेश गृहउद्योग येथील पत्र्याच्या शेडमधून शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील 50 किलो वजनाच्या 600 गोण्या तांदूळ दुसऱ्या गोण्यामध्ये पलटी मारून विना परवाना काळ्या बाजारात मुंबई येथे विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची कबुली त्यांनी दिली. पथकाने 6 लाख 45 हजार रूपये किंमतीच्या 600 गोण्या तांदूळ, 20 हजाराचे दोन मोबाईल, 50 लाखाचा मालट्रक असा एकूण 56 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.