नवी दिल्ली – रिलायन्स जिओच्या मोस्ट अवेटेड डिव्हाईस जिओ एअर फायबरची वाट पाहत असलेल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण मीटिंगमध्ये Jio Air Fiber लाँच करण्याची तारीख जाहीर केली. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला Jio Air Fiber लाँच होणार आहे. यामध्ये, ग्राहकांना केबलशिवाय हायस्पीड 5G इंटरनेटची सुविधा मिळू शकणार आहे.
रिलायन्स जिओने जिओ एअर फायबरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. आता याद्वारे तुम्ही कोणत्याही वायरशिवाय इंटरनेटच्या सुविधेचा लाभ घेऊ शकाल. एजीएमच्या बैठकीत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की सध्या 10 दशलक्षाहून अधिक ठिकाणे Jio च्या ऑप्टिकल फायबर सेवेशी जोडलेली आहेत.
अंबानी म्हणाले की, देशात लाखो ठिकाणे आहेत जिथे वायरद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी जिओ एअर फायबर इंटरनेटची कमतरता पूर्ण करेल. त्यांनी सांगितले की जिओ एअर फायबरच्या माध्यमातून आम्ही सुमारे 20 कोटी घरांमध्ये इंटरनेट पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत. त्यांनी सांगितले की, लॉन्च झाल्यानंतर दररोज सुमारे 1.5 लाख कनेक्शन केले जातील. यामुळे इंटरनेटच्या जगात क्रांतिकारी बदल घडतील असंही ते यावेळी म्हणाले.
जिओचे ऑप्टिकल फायबर भारतात 15 लाख किमी पसरले आहे. त्याचे ग्राहक दरमहा 280 GB पेक्षा जास्त डेटा वापरतात. हे Jio च्या प्रति युजर मोबाईल डेटापेक्षा 10 पट जास्त आहे.त्यामुळे आगामी काळात जिओ एअर फायबर खूपच किफायतशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे.