गंगा पाण्याबाबत तोडगा निघेल
नवी दिल्ली, दि. 9 – भारत व बांगला देश यांच्यात गंगा नदीच्या पाणी वाटपासंबंधी तोडगा निघेल व तयार असलेल्या फराक्का धरणात लवकरच पाणी साठविले जाईल अशी आशा येथे माहितगार गोटातून व्यक्त करण्यात आली. धरणाचा कालवा बांधून तयार आहे. या धरणामुळे बांगला देशातील पाटबंधाऱ्यांच्या विकासात कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही, असे या गोटातून स्पष्ट करण्यात आले. या पाण्याच्या साठ्यामुळे फराक्का ते हार्डिज ब्रिज (बांगला देश) पर्यंत गंगेच्या दोन्ही काठांवरील जमिनीतून सहा हजार क्युसेक पाणी उपलब्ध होईल.
औद्योगिक प्रगतीसाठी त्याग करावा
टोकियो- चीनच्या औद्योगिक प्रगतीसाठी 65 कोटी चिनी जनतेने तयार राहावे, असे आवाहन अध्यक्ष माओ यांनी केले आहे. 1976 पासून चीनची पंचवार्षिक योजना सुरू होत असून औद्योगिक विकासाची दशवार्षिक योजनाही सुरू होत आहे. त्यासाठी जनतेने पायाचे दगड बनावे असे माओंनी म्हटले आहे.
समग्र क्रांतीच्या भाषेमुळे लोकशाही कमकुवत होईल
पंढरपूर – गरिबी हटावो ही काही जादूची कांडी नव्हे. पण आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पण काही लोक त्यात अडथळा आणीत आहेत. समग्र क्रांतीची भाषा वापरून लोकशाही कमकुवत करीत आहेत. अशा वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांत जाऊन लोकांना परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे, असे उद्गार परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यापुढे बोलताना काढले. चव्हाण यांनी पक्षात दुही माजवणाऱ्यांवर आणि जेपींच्या आंदोलनावर टीका केली.
इंजिनाशिवाय गाडी!
बुखारेस्ट (रुमानिया) – रुमानियन इंजिनाशिवाय चालणारी रेल्वेगाडी तयार केली आहे. या गाडीच्या प्रत्येक डब्याच्या “ऍक्सल’ला इलेक्ट्रिक इंजिनाप्रमाणे एक साधन बसविलेले असते. ही गाडी ताशी 80 ते 100 किमी वेगाने जाऊ शकते. 13 डब्यांच्या अशा गाडीला नेहमीच्या इलेक्ट्रिक इंजिनाला लागते त्यापेक्षा कमी वीज लागेल.