एकाच राजकीय पक्षाचे वर्चस्व यापुढे राहणार नाही
कलकत्ता, दि. 5 – मार्क्सवादी नेते नंबुद्रीपाद यांनी येथे असे मत व्यक्त केले की, देशात एकच राजकीय पक्ष वर्चस्व गाजवीत राहील असे दिवस आता संपले. आता डावी व लोकशाही सामर्थ्य सत्तासंपन्न होतील असा जमाना येत आहे. याबाबत बोलताना नंबुद्रीपाद पुढे म्हणाले, कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येणार नाही किंवा जनता पक्षही कॉंग्रेसची जागा घेऊ शकणार नाही. जनता पक्षात फूट पडेल किंवा नाही हे जरी सांगता आले नाही तरी प्रत्येक पक्षातून डावे लोक बाहेर पडतील व त्यांचे व्यापक स्वरूपावर ऐक्य होईल.
वैद्यकीय मदत खेड्यापर्यंत पोहचत नाही
पुणे – सरकारतर्फे देण्यात येणारी वैद्यकीय सेवा खेड्यातील जनतेपर्यंत पोहचत नाही हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही, असे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सांगितले.
भारत-रशिया सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय
नवी दिल्ली – भारत व रशिया यांनी परस्परातील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा व समानतेच्या पायावर संबंध अधिक सखोल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले. परस्परातील मैत्री तिसऱ्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याच्या आड येणार नाही.