– तुषार भ. कुटे
आजपासून बरोबर साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेली शिवराज्याभिषेकाची घटना ही 17 व्या शतकातील एक अद्वितीय अशी घटना होती. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त…
शिवाजी महाराजांचा “महाराजा अभिषेक’ हा महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक ऐक्यतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा प्रसंग होता; परंतु याविषयी विस्तृत अशी माहिती इतिहास संशोधकांना उपलब्ध नव्हती. इसवी सन 1943 मध्ये इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्ट यांनी स्वतः लिहिलेल्या “श्रीशिवराजाभिषेक प्रयोग:’ या पोथीचा शोध घेतला. या दुर्मिळ संस्कृत ग्रंथाद्वारे गागाभट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कशाप्रकारे पार पाडला, याची विस्तृत माहिती सर्वांना मिळाली.
गागाभट्ट यांच्या “श्रीशिवराजाभिषेक प्रयोग:’ या पोथीची एक प्रत वा. सी. बेंद्रे यांना बिकानेर राज्याच्या राजहस्तलिखित संग्रहामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. खरंतर ही मूळ प्रत नव्हती. मनुभाई मेहता नावाचे गृहस्थ येथे दिवाण म्हणून असताना त्यांच्या सौजन्याने तेथील पंडिताकडून नक्कल करून घेतलेली प्रत 14 जून 1943 रोजी बेंद्रे यांच्या हातात पडली. स्वतः गागाभट्ट यांनीच या ग्रंथाचे लेखन केले असल्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नक्की कसा झाला, कोणत्या पद्धतीने झाला, याची विस्तृत माहिती यामध्ये वाचायला मिळाली. हा एक अनमोल ठेवा होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी केलेल्या मंत्रांची माहिती या ग्रंथामध्ये होती.
म्हणूनच राज्याभिषेक संस्कार कशा पद्धतीने झाला, याचे वर्णन या पोथीद्वारे इतिहासकारांना अभ्यासता आले. बेंद्रे यांनी या संस्कृत पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन करण्याचे योजिले असता त्यांना प्रकाशकांकडून देखील अडचणींचा सामना करावा लागला. या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी स्वतः पेलविली. एकदा तर एका प्रकाशकाकडून सदर ग्रंथ गहाळदेखील झाला होता. पण बेंद्रे यांनी पुन्हा जिद्दीने सर्व खटाटोप करून हा ग्रंथ संपादित केला. यात बराच काळ गेला. अखेरीस तब्बल 16 वर्षांनंतर 19 जून 1959 रोजी बेंद्रे यांनी या संपादित ग्रंथाचे प्रकाशन केले. केवळ मूळ श्लोकच या ग्रंथामध्ये न ठेवता त्याच्या विस्तृत मराठी विवेचनाचा देखील समावेश त्यांनी केला होता.
आपल्या विवेचन व विश्लेषणामध्ये बेंद्रे लिहितात, “सांस्कृतिक उत्क्रांतीच्या दृष्टीने सतराव्या शतकातील महाराष्ट्र ही एक इतिहासातील अद्वितीय घटना आहे. सुवर्ण जसजसे तावून सुलाखून घेण्याचे प्रयत्न केले म्हणजे ते अधिकाधिक कसास उतरत जाते, तसाच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा सतराव्या शतकातील इतिहास चिकित्सेच्या मुशीत घालून काढू लागले की, तो अधिकाधिक तेजपूर्ण व सकस ठरतो. स्वरूपशोभेसाठी सुवर्णाची भूषणे करिता सुवर्णाला निकस करण्याचा असा प्रामाणिक प्रयत्न होतो, तसेच आत्ममहतीसाठी मातृपितृसंस्कृतीचे लेणे चढविताना अज्ञानाने या संस्कृतीला निकस बनविली जाते. महाराष्ट्राने या सतराव्या शतकातील सांस्कृतिक उत्क्रांतीचा साज चढविण्यासाठी गेली दोन-तीन शतके असाच प्रकार केला आहे. त्यामुळे या उत्क्रांत संस्कृतीचे तेज व कस गढूळ केला गेल्याने आताच्या चिकित्सा युगातील प्रामाणिक निरीक्षकालाही त्या संस्कृतीची परीक्षा करणे दुरापास्त होऊन बसले आहे.
सतराव्या शतकातील संतांच्या कामगिरीने समाजाची नैतिक व पारमार्थिक संस्कृती सहजच उत्क्रांत झाली, जनता जनार्दनरूपी सर्वव्यापी परमेश्वराने अधिष्ठान महाराष्ट्राच्या हृत्पटलावर चिरंतन केले आणि साध्या माणुसकीत जसे नैतिक व पारमार्थिक समाधानाच्या संस्कृतीचे सकस बीजारोपण केले, तसेच सतराव्या शतकातील राजव्यवहारपटू व समाजद्रष्टे यांनी साध्या माणुसकीत धार्मिक, राजकीय व व्यावहारिक उत्क्रांत संस्कृतीचे जोरकस बीजारोपण केले. अखिल भारतात दोन-चार शतके स्वार्थ आणि सत्ता हीच राजकीय सामाजिक व धार्मिक व्यवहारातील मुख्य सूत्रे झाल्याने कुटुंब, जाती, राज्य व धर्म या चारी संस्थांना तडे गेले होते. राजपुत्राने बाप-भावांचा खून करून उजळ माथ्याने व सन्मानाने राजभोग घेणे, अमात्याने राजाचा खून करून सत्ता चालविणे,
सासऱ्याने जावयाचा खून करण्यास प्रवृत्त होणे, बंधू-बंधूनी एकमेकांशी सेवकवृत्तीसाठी झगडणे, आप्तेष्टांच्या धर्मसंस्थेचा विध्वंस करण्यास त्याच हीन वृत्तीने उद्युक्त होणे, वगैरे तत्कालीन रूढ प्रवृत्तींनी कुटुंब व समाज हा पूर्णपणे विस्कळीत व असंघटित झाला होता. त्याच वेळी धार्मिक, सामाजिक व राजकीय व्यवहारात नैतिक व संघटनात्मक उत्क्रांत संस्कृतीची बीजे रोपित आणि अंकुरीत करण्याचे कार्य शिवाजी महाराज व त्यांचे प्रागतिक कदाचित क्रांतिवादी साहाय्यकऱ्यांनी केले. संत आणि हे राजव्यवहारतज्ज्ञ कर्मधर्मसंयोगाने या शतकात एकाच वेळी एकमेकांना पूरक कार्य करीत राहिले आणि त्यामुळेच हा योग महाराष्ट्राच्या सर्वांगीण संस्कृतीला थोड्याच अवधित उत्क्रांतावस्थेस नेण्यास समर्थ व कारणीभूत झाला.
शिवाजी महाराजांच्या ज्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक व पारमार्थिक संस्कृतीची मूल्ये खोलवर रुजली गेली, त्याच महाराष्ट्राच्या हृत्पटलावर राजसंस्थेच्या उत्क्रांत संस्कृतीचे प्रतिबिंब चिरंजीव करण्याचे कार्य या शिवराज्याभिषेक विधीत आहे. कारण, त्या घटनेने राज्यव्यवहारात अखिल समाजाला समानतेच्या पातळीवर आणले व धार्मिक आणि व्यावहारिक पारतंत्र्याला आळा घालण्याचे एक तंत्र निर्माण केले. काशीस्थ गागाभट्ट व पैठणचे अनंतदेवभट्ट यांचा नि:स्वार्थी मानवतेचा जिव्हाळा शिवाजी महाराजांच्या सांस्कृतिक कार्यात सहजच साहाय्यक झाला आणि शिवराज्याभिषेकाने सतराव्या शतकात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि व्यावहारिक संघटनेचे एक उत्तम व प्रभावी साधन महाराष्ट्राच्या हाती आले.
विधीच्या चिकित्सेपेक्षा त्या विधीमागील भावनांचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील सांस्कृतिक उत्क्रांतीची ही एक महत्त्वाची घटना होती आणि त्या विधीतील ऐहिक तपशिलाचा जीव जरी विनाशी असला, तरी त्या घटनेतील सांस्कृतिक तत्त्वांचा आत्मा अमर होता, याची आजही प्रचिती येते. मात्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र यातील ही मूल्ये अधिक चिकित्सेने व अभ्यासूवृत्तीने शोधली पाहिजेत.’ या ग्रंथाद्वारे शिवराज्याभिषेकाचे सर्वआयामी विश्लेषण करण्यास वा. सी. बेंद्रे यशस्वी ठरले आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्वितीय प्रसंग सदर ग्रंथामुळे इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी आणि इतिहास अभ्यासक यांना उपलब्ध झाला, त्याबद्दल बेंद्रे यांचे आभार मानावे तितके कमीच आहे!