राष्ट्रीय डावी आघाडी स्थापन होणार?
नेल्लोर, दि. 23 – व्यापक स्वरूपाची “राष्ट्रीय डावी लोकशाहीवादी आघाडी’ स्थापन होण्याची सध्या नितांत आवश्यकता असून याबाबत कागदपत्रे तयार केली जात आहेत, असे माजी केंद्रीय मजूरमंत्री के. व्ही. रघुनाथ रेड्डी यांनी येथे जाहीर केले. ते पुढे म्हणाले, की ऑगस्टमध्ये हैदराबाद येथे “सोशलिस्ट एज्युकेशन सोसायटी’चे अधिवेशन भरणार असून त्यात यावर विचारविनिमय होईल. लोकशाहीचे संरक्षण हा या आघाडीचा मूलभूत हेतू असेल.
भारतीय जहाजांना चिनी बंदरे खुली
नवी दिल्ली – आज लोकसभेत परराष्ट्र मंत्री वाजपेयी यांनी सांगितले, की भारतीय जहाजांना चिनी बंदरांत नांगर टाकण्यास चीन सरकारने परवानगी दिली आहे. भारताने व चीनने एकमेकांकडे वकील पाठविण्याचे मान्य केल्यावर चीनबरोबर व्यापार सुरू करण्याचे पुढचे पाऊल भारताने उचलले. चीन-भारत संबंधात सुधारणा होत आहे; पण ती एकतर्फी असू शकत नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले. मी तूर्त तरी चीनला जाणार नाही, असेही वाजपेयी म्हणाले.