अलिप्ततेचे परराष्ट्रीय धोरण संकुचित स्वरुपाचे
वाराणसी, दि. 6 – भारत सरकारचे अलिप्ततेचे परराष्ट्रीय धोरण ही एक संकुचित कल्पना असल्यामुळे ते धोरण बदलावे असे मत खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी येथे व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, आम्ही कोणत्याही बड्या राष्ट्रांशी संलग्न नाही असे म्हणणे ही एक बुरसटलेली कल्पना असून ती आता जुनी झाली आहे. यापुढे भारताने आशिया खंडात एक प्रभावी राष्ट्र म्हणून पुढे आले पाहिजे. विशेषतः छोट्या राष्ट्रांना त्यांच्या विकासाचे कामी सर्व तऱ्हेचे साहाय्य करावे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
विकसनशील देशात कुटुंब नियोजन महत्त्वाचे
कलकत्ता – जेथे साधनांची कमतरता आहे तेथे विकसनशील देशांनी आपल्या जनतेला अधिकाधिक शैक्षणिक व आर्थिक संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, असे पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले.
जनतेच्या गरजेच्या प्रमाणात साधनांची विपुलता लगेच होणार नाही असे सांगत ते म्हणाले, याचमुळे विकसनशील देशात कुटुंब नियोजन महत्त्वाचे आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या देश दीर्घकाळ विकसनशील देश राहतो. दुसऱ्या आशियाई कुटुंब कल्याण नियोजन कॉंग्रेसला पाठविलेल्या संदेशात देसाई यांनी वरील मत व्यक्त केले आहे.