नियोजनाचा कार्यक्रम रद्द होणार नाही
नवी दिल्ली, दि. 5 – पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी येथे असा खुलासा केला की, नियोजनाचा कार्यक्रम सरकार रद्द करणार आहे ही अफवा संपूर्णपणे निराधार आहे. उलट वस्तुनिष्ठ व प्रभावी नियोजन हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मी पुन्हा जनतेचे नेतृत्व करणार
सुरत – इंदिरा गांधी यांनी आज बलसार जिल्ह्यातील धरमपूर येथे भाषण केले. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी लवकरच पुन्हा सक्रिय राजकारणात भाग घेणार आहे. जनतेचे नेतृत्व मी पुन्हा करणार आहे. तारकेश्वरी सिन्हा व वसंत साठे हे दोघे इंदिराजींबरोबर गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत.
संगीतकार तयार करण्यासाठी नवी योजना
पुणे – भारतातील अभिजात शास्त्रीय संगीताची जपणूक व्हावी यासाठी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध घराण्यांची परंपरा चालू ठेवून संगीतकारांची नवी पिढी तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन एक योजना मंजूर करून तात्काळ कार्यान्वित करीत आहे, असे समाजकल्याण मंत्री दादासाहेब रूपवते यांनी सांगितले.
या योजनेनुसार संगीतातील प्रसिद्ध घराण्यांतील गुरू निवडण्यात येतील. त्याबरोबर लायक व तयार होऊ शकतील असे शिष्य शोधण्यात येतील. यासाठी जाणकार लोकांची निवड मंडळे (पॅनेल्स्) नेमून त्यांचे मार्फत गुरू व विद्यार्थी निश्चित करण्यात येतील. या योजनेत नर्तकांची नवी पिढी तयार करण्याच्या योजनेचाही अंतर्भाव आहे.