उरुळी कांचन, (वार्ताहर)- शेतातील अनावश्यक गवत पेटविल्याने शेजारी असलेल्या डाळिंब बागेची 25 झाडेही गवतासोबतच जळून खाक झाली. ही घटना टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली. या घटनेत शेतकर्याचे तब्बल सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नुकसानग्रस्त शेतकर्याने खबर दिली.
नंदू शिवाजी टिळेकर (वय 45, रा. टिळेकर मळा) असे नुकसान झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. नुकसानग्रस्त शेतकरी नंदू टिळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत टिळेकर यांची शेती आहे. या शेतीत मागील आठ वर्षापासून डाळिंब हे पिक घेतात. डाळिंबाच्या बागेची छाटणी केली असून, निघालेल्या डाळिंबाच्या झाडाच्या फांद्या बागेशेजारी असणार्या बांधावर टाकल्या होत्या.
टिळेकर यांच्या शेतीच्या शेजारी गणेश विष्णु बगाडे (रा. बगाडेवस्ती, उरुळी कांचन) यांची शेतजमीन असून, त्यांचा कामगार योगेश सुरेश टिळेकर (रा. टिळेकरवाडी) हा शेती करत आहे. रविवारी (दि. 7) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतातील डाळिंबाच्या बागेतील झाडांना आलेली फूट काढत असताना शेजारी असणारे मोकळ्या शेतातील वाळलेले गवत योगेश टिळेकर हा जाळत होता.
त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास टिळेकर घरी गेले होते. दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुतण्या आशिष टिळेकर याने शेतातील डाळिंबाची 20 ते 25 झाडे जळाल्याचे सांगितले. तेव्हा तिथं जाऊन पाहणी केली असता शेताच्या बांधावरील सर्व झाडाच्या फांद्या जळाल्यामुळे त्याची आगही शेतात असणारे डाळिंबाच्या झाडांना लागल्यामुळे शेतातील 25 झाडे जळाली होती.
दरम्यान, या आगीत नंदू टिळेकर यांचे तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी पंचनामा केला आहे. तर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला असून, उरुळी कांचन पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केला नाही.
नुकसान भरपाईची मागणी
नुकसानग्रस्त शेतकरी नंदू टिळेकर यांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. यावर उरुळी कांचन पोलीस काय कारवाई करणार, याकडे टिळेकरवाडीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलिसांनी कारवाई करावी
नंदू टिळेकर यांनी आठ वर्षापूर्वी बाग लावली होती. त्यावेळीही अज्ञात व्यक्तींनी नंदकुमार टिळेकर यांच्या शेतीमधील तब्बल 300 डाळिंबाची रोपे रात्रीच्या वेळेस उपटून टाकून मोठे नुकसान केले होते. शेतकरी टिळेकर यांच्या शेतातील बागेचे वारंवार नुकसान करणार्यावर उरुळी कांचन पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे