महाबळेश्वर (प्रतिनिधी) – महाबळेश्वर शहरात सुशोभिकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. येथील उन्हाळी पर्यटन हंगाम अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असूनही, काम गतीने पूर्ण करण्याची ठेकेदाराची मानसिकता नसल्याचा आरोप होत आहे. हे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याने थंड हवेचे ठिकाण असलेल्या पर्यटनस्थळाचे वातावरण चांगलेच तापले आहे. व्यापार्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, त्यांनी शुक्रवारी नगर परिषदेत ठिय्या मारला.
यावेळी व्यापारी विशाल तोष्णीवाल, हेमंत साळवी, सचिन वागदरे, डी. एम. बावळेकर, रमेश पल्लोड, ज्योती बोधले, वृषाली डोईफोडे, अतुल सलागरे, अॅड. संजय जंगम, राजेंद्र पंडित, केतन यादव, अभिजित खुरासणे, सनी अरोरा, मनीष मुक्कावार, सचिन गुजर, आकाश साळुंके, सागर सोनावणे, धनंजय भिसे, नितीन काळे, बंटी शेटे, मंगेश शिपटे, महेश ताथवडेकर, राहुल तांबे, राजेंद्र धोत्रे उपस्थित होते.
महाबळेश्वरमध्ये सुशोभिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे आणि अतिशय संथगतीने सुरू आहे. ठेकेदार राम सवानी आणि वास्तुविशारद पंकज जोशी यांच्याकडून काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख मिळत आहे. मुख्य बाजारपेठ, मस्जिद रोड, स्कूल मोहल्ला, पेटिट लायब्ररी अशा विविध भागांतील अर्धवट राहिली आहेत. त्यावरून सवानी, जोशी आणि व्यापारी यांच्यातील वाद संपायचे नाव घेत नाही.
ही बाब व्यापारी वर्गाच्या सहनशीलतेपलीकडे गेल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या कामासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ ठेकेदाराकडून उपलब्ध होत नाही. मनुष्यबळ वाढवण्याची ठेकेदाराची तयारी नाही. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा ठेकेदारामध्ये कोणतीच सुधारणा झालेली नाही, असा नागरिक आणि व्यापार्यांचा आरोप आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही वारंवार तक्रारी झाल्या आहेत.
हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला अनेकदा मुदतवाढही देण्यात आली आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सातारा पालिकेचे प्रशासक अभिजित बापट यांना पाठवण्यात आले होते.
त्यांनीही या कामाबाबत नाराजी व्यक्त करून, महाबळेश्वर पालिका आणि ठेकेदारास सूचना केल्या होत्या; परंतु ठेकेदाराकडून आजपर्यंत एकही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. मुख्य बाजारपेठ व मस्जिद रोड येथील अपूर्ण बांधकामामुळे पर्यटक आणि स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांचा संयम संपला आहे. येत्या दहा दिवसांच्या आत सर्व कामे पूर्ण करावीत. ठेकदार आणि वास्तुविशारदावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.