कराची – भारताच्या 20 मच्छिमारांची पाकिस्तानातील तुरुंगातून सुटका करण्यात आली असून ते सर्वजण उद्या वाघा सीमेवरून त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. पाकिस्तानातील लोधी तुरुंगातून यासर्वांची अलिकडेच सुटका करण्यात आली आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुटका करण्यात आलेले हे 20 मच्छिमार गुजरातमधील आहेत. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या 350 भारतीय मच्छिमारांची तुरुंगवासाची शिक्षा आता पूर्ण झाली आहे. त्या सर्वांना टप्प्याने मुक्त केले जाणार आहे. पहिल्यांदा 20 मच्छिमारांना उद्या वाघा- अटारी सीमेवरून भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
या मच्छिमारांना सुरक्षितपणे वाघा सीमेवर आणण्याची व्यवस्था “द ईधी ट्रस्ट फौंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. या भारतीय मच्छिमारांना काही भेटवस्तू आणि रोख रक्कमही दिली जाणार असल्याचे या फौंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार ईधी यांचे पुत्र फैजल ईधी यांनी सांगितले.
या मच्छिमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने अटक केली होती. पाकिस्तानी सागरी हद्दीमध्ये मासेमारी केल्याच्या आरोपाबद्दल त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
अशाप्रकारे अटक करण्यात आलेले 600 भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे. राष्ट्रीयत्व निश्चित झाल्यावर आणखीन 350 मच्छिमारांचीही सुटका करण्यात येणार असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे.