नवी दिल्ली – हवामान बदलाचे परिणाम जगभरात होत असून एक शतकाहून अधिक कालावधीत भारतीय उपखंडातील तापमानात 0.7 अंश सेल्सियसची वाढ नोंदवली गेली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) वर्ष 2020मध्ये “भारतीय उपखंडातील हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडात झालेल्या हवामान बदलाच्या परिणामांचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले आहे.
सन 1901 ते 2018 या कालावधीत भारताचे सरासरी तापमान सुमारे 0.7 अंश सेल्सियसने वाढले आहे.1950 ते 2015 हा कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान अतिप्रमाणात (पर्जन्यमानाची तीव्रता प्रतिदिन दीडशे मिलीमीटरपेक्षा अधिक) होण्याची वारंवारता सुमारे 75 टक्क्यांनी वाढली.1951 ते 2015 या काळात दुष्काळ पडण्याची वारंवारता आणि दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
1993 ते 2017 या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी दरवर्षी 3.3 मिलिमीटर या वेगाने वाढत आहे. 1998 ते 2018 या काळात पावसाळ्यानंतर अरबी समुद्रात मोठी चक्रीवादळे येण्याचे प्रमाण वाढले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून भारतीय उपखंडातील हवामानावर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येते आणि निरीक्षणावरून “वार्षिक हवामानविषयक सारांश’ या वार्षिक हवामानाचे प्रकाशन करते. आयएमडी मासिक हवामानविषयक सारांश अहवाल देखील जारी करत असते. वार्षिक हवामानविषयक सारांशामध्ये देण्यात आलेल्या कालावधीतील तापमान, पाऊस, अतितीव्र हवामानविषयक घडामोडी यांच्याविषयीच्या माहितीचा समावेश असतो.