निवडणूक आयोगावरच्या टीकेला फडणवीस का उत्तर देतात? ते वकील आहेत का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; मुंबईत काँग्रेसचे आंदोलन तीव्र

मुंबई : निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच का उत्तर देतात? ते निवडणूक आयोगाचे वकील आहेत की दलाल? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील गैरप्रकारांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे. राहुल गांधीना पाठिंब्यासाठी मुंबईत काँग्रेसने तीव्र आंदोलन करत निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे.
पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल –
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ
यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधी जेव्हा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तथ्यपूर्ण आक्षेप घेतात, तेव्हा आयोग स्वतः उत्तर देण्याऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस पुढे येतात. आमचे प्रश्न निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आहेत, मग त्याचे उत्तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री का देतात? फडणवीस यांना निवडणूक आयोगाची बाजू घेण्याची गरज काय आहे? यावरून स्पष्ट आहे की, ‘दाल में कुछ काला है’.”
सपकाळ यांनी पुढे म्हटले की, जर निवडणूक आयोगाने काहीही चुकीचे केले नसेल, तर त्यांनी स्वतः उत्तर द्यावे. “भाजपला कशाची भीती आहे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर आम्ही प्रश्न उपस्थित करतो, पण त्यावर फडणवीस का चिडतात? त्यांनी चौकशी करू, असे म्हणणे अपेक्षित होते, पण त्यांचा अविर्भाव वेगळाच आहे,” असे सपकाळ यांनी नमूद केले.
बिहारमधील मतदार यादीत गैरप्रकारांचा आरोप –
हर्षवर्धन सपकाळ यांनी बिहारमधील मतदार यादीतील गैरप्रकारांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “बिहारमध्ये मतदार यादीतून 65 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यामागे भाजप आणि निवडणूक आयोगाचे संगनमत असल्याचे पुरावे आहेत. हा लढा आम्ही बिहारसह देशभर लढणार आहोत. महाराष्ट्रातही याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.” यासंदर्भात काँग्रेसने मुंबईत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले, ज्यात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे, प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
राहुल गांधींचे दावे पुराव्यांवर आधारित –
राहुल गांधी यांनी निवडणुकीत मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप करताना सर्व दावे शासकीय दस्तऐवजांवर आधारित असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. “राहुल गांधी यांनी सात फूट उंचीचे पुरावे सादर केले आहेत. हे सर्व दस्तऐवज शासकीय आहेत आणि तपासले जाऊ शकतात. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी,” अशी मागणी सपकाळ यांनी केली. त्यांनी राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मत चोरीच्या प्रकरणाला सत्याची लढाई संबोधत याविरोधात काँग्रेस कठोर पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले.
VVPAT हटवण्यावरही आक्षेप –
सपकाळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून VVPAT (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) हटवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “VVPAT हटवणे हा मतदान प्रक्रियेत चोरी होत असल्याचा ठोस पुरावा आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
निवडणूक आयोग आणि भाजपवर दबाव वाढणार –
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणूक आयोग आणि भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे आणि काँग्रेसच्या आंदोलनामुळे निवडणूक आयोगावर पारदर्शकतेचा दबाव वाढला आहे. येत्या काळात या प्रकरणावर काँग्रेस बिहार आणि महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलने करणार असल्याचे संकेत सपकाळ यांनी दिले आहेत.
राजकीय वातावरण तापले –
सपकाळ यांच्या या टीकेमुळे आणि मुंबईतील आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या या आंदोलनामुळे भाजप आणि निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यावर भाजप आणि फडणवीस काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





