बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला गुरुवारी १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड यासह सात आरोपी तुरुंगात आहेत. मात्र, कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. दरम्यान, आम्हाला कृष्णा आंधळेचे स्पष्टीकरण पाहिजे आहे. तो कुठे आहे? का सापडत नाही? हे पोलिसांनी सांगितले पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले. मस्साजोग येथील आवादा एनर्जी कंपनीच्या पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी केलेल्या २ कोटी रुपयांच्या खंडणीस सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केल्यावरून सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी खून, खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सुधीर सांगळे या सात जणांना अटक केली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी फरारआहे. कृष्णा आंधळेला जेरबंद करून फाशी द्या : देशमुख धनंजय देशमुख म्हणाले की, कृष्णा आंधळे बाबत पोलिस यंत्रणेने आता सगळ्या समाजाला सांगणे गरजेचे आहे. आम्हाला देखील कृष्णा आंधळेचे स्पष्टीकरण पाहिजे आहे. तो कुठे आहे? तो का सापडत नाही? हे पोलिसांनी सांगितले पाहिजे, त्याला लवकरात लवकर जेरबंद करून फाशी द्यावी. अशी आमची मागणी आहे. शंभर दिवसांचा कालावधी खूप मोठा आहे. या काळात एखादा आरोपी न सापडणे गंभीर प्रकार आहे. आता याबाबत काही भूमिका घ्यायची गरज पडली तर गावाच्या विचाराने घेऊ, असेही धनंजय देशमुख म्हणाले. हत्येचा शंभर दिवसांचा प्रवास खूप खडतर पुढे बोलताना म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येचा शंभर दिवसांचा प्रवास खूप खडतर होता. या काळात आम्हाला खूप मोठा त्रास झाला. कुटुंबात बसून दुःख व्यक्त करायला आम्हाला वेळ मिळाला नाही. न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. या काळात सगळ्या जाती-धर्माच्या लोकांनी साथ दिली. अन्यथा आमच्या अडचणी वाढल्या असत्या. ज्या दिवशी आरोपींना फाशी होईल तो दिवस न्यायाचा असेल, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.