Santosh Deshmukh : मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणात केस मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. (Santosh Deshmukh) धनंजय देशमुख यांनी सांगितले की, संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना एका ठिकाणी बोलावण्यात आले होते. मात्र, संशय आल्याने ते त्या ठिकाणी गेले नाहीत. “माझे खच्चीकरण करण्यासाठी आणि बदनामी करण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी न्यायासाठी लढत राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. या आधी धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनीही तुरुंगातून सुटल्यानंतर तत्सम दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वतःवरील गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या दाव्याला आता धनंजय देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, या संदर्भात धनंजय देशमुख, भाजप आमदार सुरेश धस आणि दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. मस्साजोग गावातील कायदा-सुव्यवस्था आणि चोरीच्या घटनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. (Santosh Deshmukh) खिंडकर यांनी यापूर्वी केलेल्या दाव्यात, जुन्या व्हिडिओच्या आधारे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच, गावातील काही व्यक्तींनी खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचेही त्यांनी म्हटले होते. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Santosh Deshmukh)