Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हा तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा खळबळजनक दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. काय आहे नवा दावा? धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गुपचूप गावी आला आणि कुटुंबीयांनाही भेटून गेला. त्यामुळे तपास यंत्रणांनी तो कोणाला भेटला, कोणाच्या संपर्कात होता याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख यांचे डिसेंबर 2025 मध्ये खंडणी प्रकरणातून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, प्रतिक घुले यांच्यासह आठ जणांना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली आहे. बीडच्या विशेष न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरू असून पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले आहे. पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. आरोपी कृष्णा आंधळे कोण? कृष्णा आंधळे हा मूळचा संभाजीनगर परिसरातील असून पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र त्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळल्याचे सांगितले जाते. हत्या प्रकरण उघड झाल्यापासून तो फरार आहे. तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. फरार काळात तो विविध राज्यांत फिरत असल्याची चर्चा आहे. वाल्मिक कराड सुप्रीम कोर्टात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने जामिनासाठी आधी औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केले होते. मात्र ते फेटाळण्यात आले. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. हत्या प्रकरणातील या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, फरार आरोपीच्या हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.