Weather update : देशासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार.! जनजीवन विस्कळीत, नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नदी, नाले आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

Weather update – देशासह अनेक राज्यांमध्ये शुक्रवारी पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाममध्ये काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी भूस्खलनामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पश्िचम महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून जालना जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडत आहे. विविध भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे विदर्भातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अमरावती जिल्ह्यातील सिपना नदीला पूर आला आहे. नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिकमध्येही पावसाचा जोर कायम असून गोदावरी नदीला पूर आला आहे. जळगावमध्येही रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हतनूर धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरणाचे 36 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावत ९३ महसूल मंडळांपैकी तब्बल ७३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून नदी, नाले आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून किंवा पुलांवरून वाहने नेऊ नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशात पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, राज्यात भूस्खलन आणि पुरामुळे 130 रस्ते बंद झाले असून, ते पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.
दुसरीकडे आसाममधील पूरस्थिती शुक्रवारीही गंभीर राहिली. आणखी दोन जणांच्या मृत्यूने राज्यातील पुरामुळे मृतांचा आकडा 80 वर पोहोचला असून, तीन लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.






