Water Scarcity : धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई
Water Scarcity : नद्यांची उगमस्थाने असूनही आंदर मावळातील वाड्या-वस्त्या तहानलेल्या; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना किलोमीटरची पायपीट.

Water Scarcity – नद्यांची उगमस्थाने, लहान-मोठी धरणे, दरवर्षी मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, डोंगर-दऱ्यांनी नटलेला परिसर अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विशेषत: आंदर मावळातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये उन्हाळ्याच्या झळांसोबतच पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र झाले आहे.
विहिरी, झरे आणि लहान जलस्रोत आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज अनेक किलोमीटर अंतर पार करून पाणी आणावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. या भागातील काही वस्त्यांमध्ये नळपाणी योजना असूनही पाण्याचा पुरवठा अपुरा पडत आहे.
परिणामी नागरिकांना नैसर्गिक झरे, विहिरी किंवा डोंगरकपारीतील पाणीसाठ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची गुणवत्ता देखील समाधानकारक नसल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
त्यामुळे दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे, नवीन विहिरी, बोअरवेल पुनर्भरण, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आंदर मावळातील अनेक भाग पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी येथील मूलभूत पाणीप्रश्न अद्याप कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.





