Pune Water Scarcity : पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली! १०४ टँकरद्वारे १.७३ लाख नागरिकांना पाणीपुरवठा
Pune Water Scarcity : कुपनलिका पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी २ कोटी ५६ लाखांचा निधी; टंचाईग्रस्त गावांमध्ये अतिरिक्त जलस्त्रोत उपलब्ध करण्याचे आव्हान.

Pune Water Scarcity – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली असून, एकूण १०४ टँकरद्वारे १११ गावे आणि ४२६ वाड्यांतील एकूण १ लाख ७३ हजार ५२९ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये तूर्त पाणीसाठा असला तरी, काही तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्याबाबतची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर आणि पुरंदर तालुक्यांमधील सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार नवीन टँकर मंजूर करण्यात येत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण पाणीपुरवठा योनजांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी राज्य शासनाकडून ४३ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील बंद किंवा कमी क्षमतेने सुरू असलेल्या योजना कार्यान्वित होण्यास मदत होणार असून, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी ६११ बोअरवेल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत.
त्यासाठी २ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामांमुळे बंद पडलेल्या आणि कमी क्षमतेने सुरू असलेल्या कुपनलिका पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन ३१ नवीन कुपनलिकांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये अतिरिक्त जलस्त्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.





