हिंजवडी, (वार्ताहर) – मुळशीमधील माळेगाव येथे पाण्याचे मोठे दुर्भीक्ष होते. महिलांना ऊन, वारा, पावसात पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. परंतु माळेगाव ग्रामस्थ आणि हिंजवडी आयटी क्षेत्रातील केपीआयटी टेक्नोलॉजी या कंपनीच्या सहकार्याने माळेगाव येथे सार्वजनिक विहीर उभारण्यात आली. या विहिरीमुळे गावातील महिलांची पायपीट थांबली आहे.
सार्वजनिक विहिरीच्या उद्घाटनप्रसंगी कंपनी सीएसआरमधून विहिरीसाठी अर्थसहाय्य करणार्या केपीआयटी टेक्नोलॉजीचे वरिष्ठ व्यवस्थापक पुष्पहास जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते. या वेळी केपीआयटीचे सीएसआर अधिकारी तुषार जुवेकर तसेच ज्ञानप्रबोधिनीचे विवेक गिरिधारी, राजेंद्र कांबळे, प्रदीप जाधव, माळेगाव गावच्या सरपंच नंदा चौधरी, उपसरपंच रवींद्र कडू, अण्णा मरगळे, नथू मरगळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दुर्गम भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कंपन्यांच्या सीएसआर सोबत स्थानिक ग्रामस्थांची एकत्र येण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. असे घडून आले तरच पाणी टंचाईसारखे कितीही भीषण असलेले प्रश्न वेगाने सुटण्यास मदत होते, असे प्रतिपादन पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या बागेश्रीताई पोंक्षे यांनी केले.
गावातील अनेक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न सोडविण्यात केपीआयटी टेक्नोलॉजीचे योगदान असल्याबाबत समाधान व्यक्त करून पुष्पहास जोशी यांनी कंपनीद्वारे ग्रामीण भागात विज्ञानाची गोडी लावण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी केल्या जाणार्या ‘छोटे सायंटीस्ट’ या उपक्रमाची यावेळी माहिती दिली.
विहिरीसाठी स्वत:च्या जागेचे बक्षीसपत्र करून देणारे देविदास हणमघर यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन प्रदीप जाधव यांनी करून दिला. स्वागत नामदेव चौधरी यांनी तर आभार रवींद्र कडू यांनी मानले.
गावात पूर्वी उन्हाळ्यात शेवटचे दोन महिने पाण्याची खूप अडचण होती. डोंगरातून फिरून 3-4 किलोमीटर अंतरावरून शेजारील जातेडे गावातील करंजाईच्या विहिरीवरून पाणी आणावे लागत असे. एक हंडाभर पाणी आणण्यासाठी एक तास वेळ लागत असे. एकावेळी दोन हंडे कोणी आणू शकत नव्हते. आता या विहिरीमुळे गावातील वयस्कर लोकांची पाण्याची चांगली सोय झाली आहे. – मुक्ता मरगळे, स्थानिक महिला.