पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोनदा भेट घेऊन या प्रकरणी तात्काळ कारवाई आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. तसेच वाल्मिक कराड याचं वर्तन आणि त्याला तुरुंगात दिली जात असलेली VIP वागणूक. एवढंच नाही तर महादेव मुंडे यांच्या हत्येची पारदर्शक चौकशी व्हावी आणि त्यांच्या माऊलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी गृहमंत्री अमितभाई शहा यांची वेळ मागितली असल्याचे सुळे यांनी सांगितले. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते. मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत. मित्रपक्षांवरही मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा दिल्लीतले खासदार मला थांबून थांबून विचारत होते की, रमीचा काय प्रकार सुरू आहे? कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे? राज्यात कुठलीही घटना घडली की देशभरात पसरते. यामुळे राज्याची देशभरात प्रचंड बिकट अवस्था झाली आहे. ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला, त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता. यांना सांगावं लागतं की राजीनामा द्या, स्वतः राजीनामे देत नाहीत. दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत, असं सुळे म्हणाल्या.