Wai Revenue Department: महसूल विभागावर अंकुश कोणाचा? सर्कल अन् तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने नागरिक हैराण
Wai Revenue Department: बँक कर्जे, पीककर्ज आणि शासकीय योजनांचे लाभ अडकले; चिरीमिरी दिल्याशिवाय कामे होत नसल्याचा नागरिकांचा थेट आरोप.

– सचिन इथापे.
Wai Revenue Department – वाई तालुक्यातील महसूल विभागातील कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सातबारा उतारे, फेरफार नोंदी, दस्त नोंदणी, वारस नोंदी आदी महत्त्वाची महसुली कामे महिनोनमहिने, तर काही प्रकरणांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने शेतकरी, जमीनधारक व सर्वसामान्य नागरिकांना महसूल कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
संबंधित कार्यालयांमध्ये वेळेत कामे होत नसल्याने बँक कर्ज, पीककर्ज, मालमत्तेची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शासकीय योजनांचा लाभ आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया अडकून पडत आहेत. यामुळे आर्थिक नुकसानासह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. दरम्यान, काही नागरिकांनी संबंधित स्तरावर चिरीमिरी दिल्याशिवाय कामे मार्गी लागत नसल्याचा आरोप केला असून,
या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी होत आहे. महसूल विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून नागरिकांना वेळेत, पारदर्शक व कार्यक्षम सेवा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र वाई तालुक्यातील परिस्थितीमुळे महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी रखडलेल्या सर्व प्रकरणांचा विशेष आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करावा, संबंधित अधिकारी-कर्मचार्यांच्या कामकाजाची चौकशी करून विनाकारण विलंब होत असल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाई तालुक्यातील महसूल विभागाच्या कामकाजाची विशेष चौकशी करावी, रखडलेल्या सातबारा, फेरफार व दस्त नोंदणीच्या नोंदी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




