Varandha Ghat: धुक्याची दुलई अन् कोसळणारे धबधबे! वरंधा घाटाचे ‘हे’ रूप पाहिलेत का? पर्यटकांची तुफान गर्दी
Varandha Ghat: भोर ते महाड जोडणारा ऐतिहासिक वरंधा घाट पावसाळी पर्यटनाचे मुख्य केंद्र; वाघजाई मंदिर व शिवथरघळ परिसरात भाविकांची गर्दी.

– दीपक पारठे
Varandha Ghat – सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला ऐतिहासिक वरंधा घाट सध्या पावसाळ्यामुळे नव्या रूपात पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने डोंगररांगा हिरवाईने नटल्या असून, डोंगरकड्यांवरून कोसळणारे असंख्य धबधबे, दाट धुके आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे वरंधा घाट सध्या पावसाळी पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे.
आजही घाटातून प्रवास करताना इतिहासाच्या पाऊलखुणांसोबत सह्याद्रीचे रौद्र आणि मनमोहक रूप अनुभवायला मिळते. पावसाळ्यात घाटातील डोंगरकडे असंख्य धबधब्यांनी सजतात. काही धबधबे रस्त्यावरून सहज नजरेस पडतात, तर काही डोंगराच्या दऱ्यांमध्ये लपलेले आहेत. पांढरे शुभ्र पाण्याचे प्रवाह हिरव्यागार डोंगरांवरून कोसळताना पाहण्यासाठी पर्यटक घाटात थांबताना दिसतात.
पावसाळ्यात वरंधा घाट जितका सुंदर दिसतो, तितकाच तो धोकादायकही ठरू शकतो. मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरडी व दगड कोसळण्याचा धोका वाढतो. रस्त्यावर चिखल व माती येणे, झाडे उन्मळून पडणे तसेच दाट धुक्यामुळे वाहनचालकांना समोरचा रस्ता स्पष्ट न दिसणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांच्या अगदी जवळ जाणे,
धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे किंवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणे टाळण्याची गरज आहे. प्रशासनानेही धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. इतिहासाचा साक्षीदार, सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा खजिना आणि पावसाळ्यातील धोक्याचे आव्हान अशी वरंधा घाटाची ओळख आहे.
ऐतिहासिक वरंधा घाट
वरंधा घाट हा प्राचीन काळापासून व्यापार आणि वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड किल्ला जवळ असल्याने या मार्गाचे लष्करी व धोरणात्मक महत्त्व अधिक होते. भोर तालुक्याला महाड व कोकणाशी जोडणारा हा घाटमार्ग आहे. ब्रिटिश काळात वरंधा खिंडीत रस्त्याचे काम १८५१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १८५७ मध्ये ते पूर्ण झाले.
वाघजाई देवी मंदिर व शिवथरघळ
घाटाच्या माथ्यावर ‘वाघजाई देवी’चे छोटे व प्रसिद्ध मंदिर आहे. घाटातून प्रवास करणारे बहुतेक पर्यटक आणि वाहनचालक येथे थांबून दर्शन घेतात. घाटाच्या पायथ्याशी (महाडच्या बाजूला) ऐतिहासिक शिवथरघळ आहे. याच घळीमध्ये बसून समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोध’ या ग्रंथाचे लेखन केले होते. शिवथरघळ पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक आणि भाविक येत असतात.






