छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांचा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूक हरणार आहे, कारण त्यांच्या पक्षात आता कार्यकर्ते उरलेले नाहीत. त्यांचा नागरिकांशी कोणताही संपर्क नाही, असे शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिरसाट हे पत्रकारांशी संवाद साधत होते. शिरसाट म्हणाले, सत्ताधारी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तिकिटांची मागणी जास्त आहे. तिकिटासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण, तिकीट फक्त एकालाच मिळू शकते. अशा परिस्थितीत, काही लोक नाराज होऊ शकतात, आणि इकडे-तिकडे जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे प्रत्येकाशी गर्वाने वागतात. शिवसेना (उबाठा) बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हरणार आहे. त्यांच्याकडे आता पक्षाचे कार्यकर्ते उरलेले नाहीत. ते लोकांना भेटत नाहीत आणि कार्यकर्त्यांना पाठिंबा देत नाहीत. मागील निवडणुकांमध्ये निवडून आलेले सुमारे ५५-५७ नगरसेवक आमच्यासोबत आहेत. आता त्यांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. मुंबईची निवडणूक ही ठाकरेसेनेच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे. निवडणुकीनंतर हा पक्ष कुठे जाईल याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. ठाकरे यांनी लोकांच्या समस्या मांडण्यापेक्षा विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद मिळवण्याला अधिक प्राधान्य दिल्याचे त्यांनी म्हटले.