नवी दिल्ली – तामिळनाडूतील एका दाम्पत्याने अपघाताचा बनाव करून अडीच टन टोमॅटो असलेला एक ट्रक पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरुजवळच्या चिक्काजला येथे 8 जुलै रोजी हा प्रकार घडला असून या ट्रक मधील टोमॅटो या दाम्पत्याने अंबूर जवळच्या वानियाम्बादी येथे विकून टाकले. या ट्रकमध्ये अडीच लाख रुपयांचे टोमॅटो होते.
या घटनेत सहभागी असलेले दाम्पत्य महामार्गावरील लुटालुटीमध्ये सहभागी होते, असे पोलिसांनी सांगितले. बाजारामध्ये विक्रीसाठी टोमॅटो घेऊन जात असलेल्या एका शेतकऱ्याला अडवून त्यांनी हा ट्रक पळवून नेला.
ट्रकने आपल्या कारला धडक दिली, असे खोटे सांगून या दाम्पत्याने नुकसान भरपाई म्हणून टोमॅटोने भरलेला ट्रक ताब्यात घेतला आणि पळवून नेला होता. या शेतकऱ्याने नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण केली गेली आणि ट्रक पळवून नेला होता.
या आरोपी दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली असून त्यांच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.अपघाताचा बनाव करून या दाम्पत्याने आणखीन काही जणांची लुबाडणूक केली असल्याची काही प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यांचाही तपास पोलिसांकडून केला जातो आहे.