प्रभात वृत्तसेवा पाटस – दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात रासायनिक मिश्रित आणि दूषित सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे नदीतील परिसंस्थेला मोठा धक्का बसला आहे. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे आणि इतर जलचर प्राणी दगावले असून, मृत माशांचे थर नदीच्या पाण्यावर तरंगतानाचे विदारक दृश्य कानगाव परिसरात पाहायला मिळाले आहे. या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.सध्या भीमा नदीचे पात्र पुण्यातून वाहून आलेल्या मैलापाण्यामुळे आणि हवेली, शिरूर, शिक्रापूर भागातील औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे प्रचंड प्रदूषित झाले आहे. कंपन्यांचे प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी थेट ओढ्यांच्या माध्यमातून नदीपात्रात मिसळत असल्याने पाण्याचा रंग काळा-निळा झाला असून, नदीवर पांढऱ्या फेसाचे थर साचले आहेत. हे पाणी इतके विषारी झाले आहे की, नदीकाठची पाळीव जनावरेही ते पाणी पिताना कचरत आहेत. मासे आणि खेकड्यांसारख्या जलचरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने नदीतील जैविक साखळी धोक्यात आली आहे. नागरिकांची मागणी या गंभीर समस्येवर जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे. कंपन्यांनी सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही, अनेक उद्योगांकडून नियम धाब्यावर बसवून थेट नदीत पाणी सोडले जात आहे. अशा दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करून, नदीपात्रात केवळ शुद्ध आणि स्वच्छ पाणी सोडले जाईल याची खात्री राज्य सरकारने करावी. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर प्रदूषणाचा फटका केवळ जलचरांनाच नाही, तर मानवी जीवनालाही बसू लागला आहे. नदीकाठची शेती पिके या दूषित पाण्यामुळे धोक्यात आली आहेत. तसेच, नदीकाठच्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत या प्रदूषणाने बाधित झाले आहेत.