PCMC News – शहरातील पवना नदी सध्या प्रचंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेला यंदाचा ‘माझी वसुंधरा’अभियानातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नद्यांची प्रत्यक्ष स्थिती आणि पुरस्कारातील गौरव यामधील तफावत पाहता नागरिकांमधून आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. “पवना नदी वाचली नाही, तर पुरस्काराचा अर्थ काय?” असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. पवना नदीच्या पात्रात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर माती, दगड आणि बांधकामाचा राडारोडा टाकला जात आहे. काळेवाडी, चिंचवडगाव परिसरात नदीपात्र अरुंद होत चालले आहे. महापालिकेला माहिती असूनही काही ठिकाणी वर्षानुवर्षे टाकलेला भराव अद्याप हटविण्यात आलेला नाही. पावसाळ्यात नदीची वहनक्षमता कमी होऊन पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याची भीती स्थानिक व्यक्त करतात. रासायनिक पाणी आणि मृत मासे नदीत मिसळणाऱ्या औद्योगिक आणि रासायनिक सांडपाण्यामुळे जलजीवांवर विपरीत परिणाम होत आहे. अलीकडील काळात काही ठिकाणी मृत अवस्थेत मासे आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. पाण्याचा रंग बदलणे, फेस साचणे आणि दुर्गंधी वाढणे यामुळे नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिक त्रस्त आहेत. पाण्याच्या गुणवत्तेबाबत नियमित अहवाल जाहीर करण्याची मागणी होत असतानाही महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून ठोस माहिती पुढे येत नसल्याची टीका आहे. पवना नदी प्रदूषण ड्रेनेजचे थेट विसर्ग किवळे पासून ते दापोडी पर्यंत अनेक ठिकाणी नाले आणि ड्रेनेज लाइन थेट नदीत मिसळतात. मैलामिश्रित पाणी पवना नदीत सोडले जाते. ही परिस्थिती दरवर्षीचीच असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप नागरिक करतात. चिंचवडगावातील केशवनगर ते लक्ष्मीनगर पर्यंत नदीकाठच्या अतिक्रमणांतील सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जाते. त्यामुळेही ही नदी प्रदूषणाच्या गर्तेत गेली आहे. काही ठिकाणी नदी आहे की नाला, अशी अवस्था निर्माण झाली आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, जैवविविधतेवर याचा गंभीर परिणाम होत असून दीर्घकालीन पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. पुरस्कारावर प्रश्नचिन्ह अशा परिस्थितीत ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरातील प्रत्यक्ष पर्यावरणीय प्रश्न सोडवले गेले नसताना पुरस्कार कशाच्या आधारे देण्यात आला, याची पारदर्शक माहिती जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, कागदोपत्री अहवाल आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यामध्ये मोठी दरी आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे, भराव आणि सांडपाणी यावर कठोर कारवाई न झाल्यास कोणताही पुरस्कार केवळ प्रतीकात्मक ठरेल. शहराचा विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. पवना नदीचे प्रदूषण थांबवून त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस, वेळबद्ध आणि पारदर्शक कारवाई झाली, तरच पुरस्काराचा खरा अर्थ सिद्ध होईल; अन्यथा तो केवळ कागदावरील सन्मान ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. नदीतील गाळ कधी काढणार? राज्यातील नद्यांमधील वाळू उपसा केल्यामुळे या नद्यांची खोली कायम राहते. त्यामुळे त्यांना पूर येत नाही. मात्र पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदीतील गाळ कधीच काढलेला नाही. गटाराचे रासायनिक गाळ काढल्यावर नदीपात्र आपोआप खोल होईल व पूरस्थिती निर्माण होणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.