नवी दिल्ली – बलुच जनतेवरील अत्याचारांचा निषेध करण्यासाठी हजारो बलुच नागरिक क्वेट्टा शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले असतानाही बलुच जनतेने उग्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बलोच याकियाती कमिटीचे हजारो नागरिक क्वेट्टा शहरामध्ये शनिवारपासूनच जमा झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये बलुच वंशियांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधोत बीवायसीने अलिकडेच राजधानी इस्लामाबादेमध्ये दोन महिन्यांचे आंदोलन केले होते. आता पुन्हा तशाच मोठ्या आंदोलनाचे आवाहन बीवायसीने केले आहे.कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी क्वेट्टामधील प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव आगामी दोन आठवड्यांसाठी क्वेट्टामध्ये सतर्कता बाळगण्यात यावी. सर्व प्रकारच्या एकत्रीकरणावर बंदी घालण्यात यावी, असे निर्देश बलुचिस्तानचे माहिती मंत्री जन अचकझाई यांनी दिले आहेत. बलुच नागरिकांनी अलिकडेच केलेल्या धरणे आंदोलनाचा संदर्भही अचकझाई यांनी दिला आहे.
दुसरीकडे क्वेट्टामधील नागरिकांनी आंदोलनासाठी क्वेट्टामध्ये आलेल्यांचे स्वागतच केले आहे. बीवायसीने स्थानिक बलुच नागरिकांना मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बलुच नागरिकांच्या मोर्चावर झालेला लाठीमार आणि गोळीबारानंतर या आंदोलनाची तीव्रता आणखीनच वाढली आहे. या गोळीबारानंतर बलुच आंदोलन संपूर्ण देशभर पेटले होते.
आंदोलकांनी हिंसचाराचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन बलोच नेते महारंग बलोच यांनी केले आहे. आंदोलन शांततेने आणि संयमाने करण्यासाठी आंदोलनाच्या नेत्यांनी सर्वांसाठी एक मार्गदर्शक नियमावलीही प्रसिद्ध केली आहे. या आंदोलनामध्ये राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राजकीय झेंडे वापरले जाऊ नयेत, असेही या नियमावलीमध्ये म्हटले गेले आहे.