राहाता– गणेश कारखाना बंद पाडून ज्यांनी वैभव घालविले ते आता पुन्हा गणेशला वैभव प्राप्त करुन देण्याची करीत असलेली भाषा त्यांना शोभत नाही. आठ वर्षे ऊस घेवून जात होते. त्यांनी आम्हाला येथे येवून तत्वज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. ऊस कोणाला द्यायचा याचा सर्वस्वी निर्णय शेतकरी सभासद करतील. मलाही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभेच राहावे लागेल, असे स्पष्ट करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाव न घेता आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
शासन आपल्या दारी उपक्रमात डॉ. धनंजय धनवटे, सदाशिव धनवटे, बाबुराव लोंढे, डॉ.संपत शेळके, बाळासाहेब गाडेकर आदिंनी गणेश कारखान्याच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री विखे पाटील यांनी भाष्य करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासित केले. ऊसाच्या नोंदी करुन घेण्याची विनंती करीत याबाबतचा ठरावही कार्यकर्त्यांनी उत्फुर्तपणे मांडला. त्याला अनुसरून मंत्री विखे पाटील यांनी भाषणात गणेश कारखान्याच्या संदर्भात भाष्य केले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील काही दिवसांपासून अनेकांचे वक्तव्य ऐकत आहोत. गणेश कारखान्याला वैभव प्राप्त करुन देणार असे भाष्य करणाऱ्यांनीच गणेशची काय अवस्था करुन ठेवली होती, हे सभासदांनी पाहिले आहे. 27 महिने कामगारांचे पगार नव्हते, शेतकऱ्यांचे पैसे थकले होते, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आर्थिक भार सोसून हा कारखाना चालू केला.
शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले. गणेश कारखाना आज कर्जमुक्त करुन तुमच्या ताब्यात दिला आहे. डॉ. विखे पाटील कारखान्याचे 30 ते 35 कोटी रुपये घेणे आहे. आठ वर्षे जे ऊस घेवून जात होते. त्यांनी आता ऊस नेवू नये, असे केलेले वक्तव्य आश्चर्यकारक वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला.
गणेश कारखान्याला तुम्ही आता कोणते वैभव प्राप्त करुन देणार, हे वैभव तुम्हीच घालविले होते.
तुम्हाला तुमचे कार्यकर्ते सांभाळायचे होते, म्हणून ऊस नेला. आता मी सुध्दा बघ्याची भूमिका घेणार नाही,कार्यकर्त्यांच्या पाठीशी मलाही खंबीरपणे उभे राहावेच लागेल असे स्पष्ट करीत मंत्री विखे पाटील म्हणाले की, ऊस कोणाला द्यायचा याचा निर्णय शेतकरी सभासद करतील. याबाबत बाहेरच्यांनी येवून आम्हाला सल्ले देवू नयेत. कार्यकर्त्यांनी आता गावपातळीवर संघटना एकीसाठी प्रयत्न करावेत, आपआपसातील मतभेद दुर करुन आगामी निवडणूकांच्या दृष्टीने काम करावे. अडीच वर्षात कोणताही निर्णय झाला नव्हता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण कोणताही फायदा जिल्ह्याचा झाला नाही. सरकार बदलल्यानंतर निर्णय कसे होतात याचा फरक आता जनतेला दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.
यंदाचे पावसाचे प्रमाण खुप कमी असल्याने पाण्याची टंचाई भेडसावणार आहे. यापुर्वी आपण नोव्हेंबर पासून आवर्तनाचे नियोजन करीत होतो. आता तर ऑगस्टमध्येच आपल्याला धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे, त्याचेही नियोजन काटेकोरपणे करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.