नवी दिल्ली – खुद्द महात्मा गांधींनी स्वतः रामराज्याची कल्पना केली होती. त्यांचे अखेरचे शब्दही ‘हे राम’ असेच होते. पण आजच्या काॅंग्रेसने भगवान रामाला काल्पनिक म्हटले आहे. त्यामुळेच अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस हायकमांडने नाकारले आहे.
यामुळे आजकाल काॅंग्रेस पक्ष हा बहिष्काराचे दुसरे नाव बनला आहे. त्यांनी खुद्द प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळ्यावरही बहिष्कार टाकला होता, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.
आताची काँग्रेस आता गांधींची नाही तर नेहरूंची झाली आहे, असे सांगून सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसने आमचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि आता द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील भाषणावर बहिष्कार टाकला होता. वर्ष २००४ नंतर २००९ पर्यंत काँग्रेसने कारगिल विजय दिवसावर बहिष्कार घातला.
मे १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोखरण अणुचाचणीनंतर काँग्रेसने दहा दिवस कोणतीही प्रततिक्रिया दिली नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता.
सुधांशु त्रिवेदी पुढे म्हणाले की, कोणतीही ऐतिहासिक घटना घडत असताना, त्याकडे पाठ फिरवण्याची काॅंग्रेसची मानसिकता बनली आहे. देशात जीएसटी लागू झाला तेव्हाही त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवणारी जी-२० परिषद झाली,
त्यावेळी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या मेजवानीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. आता उत्तम कर्मकांडातही अडथळे निर्माण करून समाधान मिळवण्याच्या प्रवृत्तीचे मूर्त रूप असलेल्या काँग्रेसमध्ये काय अडचण आहे, हेच मला कळत नाही, अशी खंत त्रिवेदी यांनी व्यक्त केली.