Recruitment : सरकारी कंपन्यातील विविध रिक्त पदांची होणार भरती

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये रिकाम्या जागा काही वर्षापासून भरण्यात आलेल्या नाहीत. याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. आता केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांमध्ये किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती मागविली आहे. त्याचबरोबर ह्या जागा कधी भरणार याचे वेळापत्रक सादर करावे असे सांगण्यात आले आहे.
वरिष्ठ पदाबरोबरच कनिष्ठ पदेही रिकामी आहेत. या सर्वांची तपशिलात माहिती या कंपन्यांनी उपलब्ध करावी असे स्पष्ट करण्यात आले. देशात बेकारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विरोधकांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत सरकारी कंपन्यातील विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
उपलब्ध माहितीनुसार देशात 255 सरकारी कंपन्या आहेत. त्यापैकी 177 कंपन्यांना नफा होत आहे. गेल्या वर्षी या कंपन्यांना 1.89 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. 2012 -13 मध्ये या कंपन्यांमध्ये 8.86 लाख कर्मचारी काम करत होते. आता या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊन 7.80 लाख इतकी झाली आहे. गेल्याच आठवड्यात बॅंकांनी नोकर भरती करावी अशी सूचना दिली आहे. त्यातल्या त्यात मागासवर्गीयांच्या जागा लवकर भरण्यात यावे असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या बॅंकांना सांगितले आहे.
PM Modi in Gujarat : 5 जी मुळे शिक्षणचा स्तर उंचावेल – पंतप्रधान मोदी
बॅंकांनी या संदर्भात जाहिराती देणे चालू केले आहे. स्टेट बॅंकेने 1,673 अधिकाऱ्याच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पुढील दीड वर्षात सरकारी विभागामध्ये दहा लाख लोकांची भरती केली जावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यामध्ये सांगितले आहे.
पुढील सार्वत्रिक निवडणुकीअगोदर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. सरकारी कंपन्यांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. रेल्वेतील ही संख्या 2.3 लाख पदांची आहे. भारतामध्ये बेकारीचा 6.43% इतका असल्याचे समजले जाते. ऑगस्ट महिन्यामध्ये हा दर 8.3% इतका वाढला होता.





