नवी दिल्ली – राज्यसभेत विरोधी सदस्यांच्या वर्तनाबद्दल उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू हे कमालिचे व्यथित झाले. सभागृहात त्यांना अश्रु आवरणे अवघड झाले. विरोधकांपैकी काही सदस्य सभागृहातील टेबलावर चढले होते. याबद्दल नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेला कलंक लावला गेल्यामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही, असे ते म्हणाले.
कृषी विधेयकांना विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन मंगळवारी राज्यसभेमध्ये चर्चा सुरू असताना विरोधकांनी जो गोंधळ घातला त्यामुळे पवित्र सभागृहाची प्रतिष्ठा खालावली गेली. मात्र त्या चिथावणीखोर कृत्यामागील कारण आपल्याला समजू शकले नाही, असे नायडू म्हणाले.
विरोधकांच्या कृत्याची निंदा करण्यासाठी, नाराजी व्यक्त करण्यासाठी आपल्याजवळ शब्दच नाहीत, अशा शब्दात नायडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सभागृहाचे काम सुरू होत असताना केलेले निवेदन वाचून दाखवताना त्यांना अश्रु आवरणे अवघड झाले.
अनेक विधेयके कोणत्याही चर्चेविना आणि काही मिनिटांमध्ये मंजूर केल्याबद्दल तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांच्या या निवेदनात अडथळा येत होत होता. मात्र तरिही त्यांनी आपले निवेदन पुढे सुरूच ठेवले.
अध्यक्षांनी निःपक्ष असायला हवे, अशी घोषणाबाजी करत तृणमूल आणि अन्य काही खासदार सभागृहातील मोकळ्या जागी एकत्र आले. नायडू यांनी या सदस्यांना वारंवार सभागृहाची गरिमा राखण्याचे आवाहन केले. आपल्या निवेदनानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब केले. मंगळवारी काही सदस्य टेबलावर चढले होते.
त्याबद्दल बोलताना ही जागा अधिकारी, सचिव आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या बसण्याची पवित्र जागा आहे. या जागेचा अवमान होणार नाही, याकडे कटाक्ष असला पाहिजे. मात्र अधिवेशन सुरू झाल्यापासून सर्व काही संकेतांचे उल्लंघन केले गेले आहे. या सभागृहाच्या प्रतिमेला लांच्छनास्पद आहे.’ असा रागही नायडू यांनी व्यक्त केला.
कृषी विधेयकावर योग्य मार्गाने चर्चा घडवून आणण्याची सुवर्णसंधी विरोधकांकडे होती. ही संधी त्यांनी गमावली आणि या सभागृहात आतापर्यंत कधीही झाले नसेल असे वर्तन केले. ही बाब अतिशय कष्टप्रद असल्याचेही त्यांनी नमूद केले.