नवी दिल्ली – देशात एका व्यक्तीने अनेक विवाह करण्याच्या संदर्भात वेगवेगळे विचार मांडले जातात. काही जणांच्या मते ही सामाजिक परंपरा आहे तर काही जण याला धार्मिक प्रथेचा आधार देतात. इस्लाम धर्मात एका व्यक्तीला चार विवाह करण्याची अनुमती देण्यात आली आहे. त्यासंदर्भात अनेकदा विरोधाचे स्वर उठले आहेत. तर समर्थनाचे सूरही ऐकले गेले आहेत. हे सगळे सुरू असताना आता चार विवाहांची ही प्रथा समाप्त करण्यासाठी आसाम सरकार पाउले उचलणार आहे.
एका पुरूषाने अनेक महिलांशी विवाह करण्यास असलेली मान्यता, त्याची गरज आणि यासंदर्भात कायदा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश रूमी कुमारी फूकन यांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची समिती नेमण्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी 12 मे रोजी केली होती. समितीत महाधिवक्ता दैवजीत सैकिया, वरिष्ठ अतिरिक्त महाधिवक्ता नलिन कोहली, वरिष्ठ अधिवक्ता नकीब उम जमां यांचा समावेश आहे.
या समितीने काल आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला असून सरकारने आता कायदा तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार इस्लामच्या मान्यतेनुसार पुरूषाने चार महिलांशी विवाह करणे अनिवार्य नाही. बहुविवाहाची प्रथा समाप्त करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने कायदा करावा असे समितीतील सर्व सदस्यांचे मत असल्याचे सरमा यांनी आज सांगितले. त्यामुळे सरकार कलम 254 नुसार असा कायदा करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. या आर्थिक वर्षातच याबाबतचे विधेयक मांडले जाणार असून राष्ट्रपतींच्या अंतिम संमतीनंतर त्यावर कायद्याची मोहोर उमटेल असे ते म्हणाले.