श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचे संकट कमी होऊ लागताच राज्यातील पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. यंदा ट्युलिप गार्डन (पंधरा लाख ट्युलिप फुलांच्या रोपांची बाग) बघण्याच्या निमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक दाखल झाले आहेत. हा एक विक्रम आहे, असे जम्मू काश्मीर पर्यटन विभागाने सांगितले.
श्रीनगर विमानतळावर येणाऱ्या तसेच श्रीनगरहून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनगर विमानातळाने एका दिवसात 92 विमानांचे नियंत्रण करून नवा विक्रम केला. ट्युलिप गार्डन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटकांसाठी खुले झाले. हे गार्डन 2 एप्रिल 2022 पर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी बघितले होते.
नियंत्रणात असलेले करोना संकट आणि कमी झालेले दहशतवादाचे संकट यामुळे जम्मू काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. पर्यटक वाढल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या जम्मू काश्मीरच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रमझान सुरू असल्यामुळे स्थानिक पर्यटकांची संख्या कमी आहे. पण देशाच्या वेगवेगळ्या भागांतून जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. रमझान संपल्यानंतर स्थानिक पर्यटकांचाही ओघ वाढेल; असे जम्मू काश्मीर पर्यटन विभागाने सांगितले.