पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राजकीय भूकंपाचे केंद्र आणि देशाच्या नकाशावर सर्वांत चर्चेची ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून पुणे जिल्ह्यातील प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. दि.१२ एप्रिलपासून येथील निवडणूक प्रक्रियया सुरू होणार असून, ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भेटीगाठींवर सुरू असलेल्या प्रचाराचे स्वरूप सोमवारपासून बदलणार आहे. राज्यभरातील नेते आणि राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा बारामतीमधून धडाडणार आहेत.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुका होत असून बारामती तिसऱ्या आणि पुणे, मावळ, शिरूर चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. बारामतीची निवडणूक प्रक्रिया दि. १२, तर पुण्याची निवडणूक प्रक्रिया १८ एप्रिलपासून सुरू होत आहे. सध्या मराठवाडा, विदर्भात प्रचाराला सुरूवात झाली असून, नेत्यांची फौज या प्रचारात आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात अद्याप नेत्यांच्या मोठया सभा अथवा जाहीर प्रचाराला वेग आलेला नव्हता. पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महिनाभरात एखादीच सभा झालेली होती. त्यामुळे उमेदवार केवळ गावभेटी व पक्षसंघटनेच्या बैठकांमध्येच गुंतले होते. तसेच निवडणूक प्रक्रिया महिनाभर लांब असल्याने आणि खर्चाची बंधने असल्याने पक्षांकडूनही जाहीर प्रचारापेक्षा छोटया बैठका भेटीगाठींवर भर दिला जात होता.
महायुतीकडून शक्तीप्रदर्शन
बारामतीत यावेळी पवार विरोधात पवार असा सामना रंगणार आहे. शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर अजित पवारांकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षासोबतच पवार कुटुंबातही फूट पडली असून, दोन्ही बाजूंनी नातेवाईकही मैदानात उतरलेले आहेत.
त्यातच, अजित पवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. अजित पवारांना काही स्थानिक नेत्यांकडूनच विरोध असल्याने ही निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे दिल्लीचे नेतेही बारामतीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांची सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. त्याद्वारे बारामतीत महायुतीकडून अजित पवारांसाठी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
महाविकास आघाडीही मैदानात
महायुतीच्या आरोपांना तसेच टीकेला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्षही बारामतीच्या मैदानात उतरणार आहेत. त्या अंतर्गत इंडिया आघाडीच्या सभेसह, काॅग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही मैदानात उतरण्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शरद पवार गटाकडून नियोजन सुरू असून स्वत: शरद पवारही बारामतीच्या मैदानात तळ ठोकून आहेत.