मारुती जैनक
स्थळ: “मातोश्री’, कलानगर, वांद्रे
दिनविशेष : चिंब पाऊस
वेळ : झुंजुमुंजूनंतरची…
का कोण जाणे पण आज भल्या सक्काळीच बाळराजांना चेकाळीच्या उकळ्या फुटत व्हत्या. बिछान्यावरून उठून त्यांनी शोकेसमधल्या आरशात तोंड खुपसलेलं. सोताच्या गोऱ्यागोमट्या छबीकडं बघ्घून ते उगाचच खुदकन हसायचे; तर कधी गुणगुणायचे. अवचितच त्यांच्या चर्येवरून गहन चिंतेची वटवाघुळं फडफडायची.
दबक्या पावलांनी बेडरूममधून बाहेर येत त्यांनी कानोसा घेतला. मातोश्रीतील सारी मंडळी गाढ झोपल्याची खात्री पटल्यावर टणाटण उड्या मारतच ते पुन्हा बेडरूममध्ये शिरले अन् होम थिएटरचं बटण ऑन केलं. “”ढिंगच्यांग डिच्यांगऽऽ…बाबा लगीन’च्या तालावर त्यांनी ठेका धरला.
…काही वेळानं मनाशी कसलीशी खूणगाठ बांधत त्यांनी आपला मोर्चा तडक राजांच्या बेडरूमकडे वळवला. काही जहालं तरी आज डॅडशी बोल्लायचंच, अस्सा निश्चयाचा महामेरू त्यांनी मनाच्या कवाडात उभा केल्येला.
बेडरूमचा दरवाजा उघडून ते आत गेल्ये. राजे गाढ झोपेत व्हत्ये. चांगले डाराडूर. बाळराजांनी गदागदा हलवितच त्यांच्या झोपेचं खोबरं केलं. त्ये ताडकन उठले. “”आणखी कसलं बालंट?..आत्ता कोण गेल्लं आम्हास सोडून तिकडच्या वळचणीला! रोज कोण ना कोण जातंय. कित्ती कित्ती जणांचं आम्ही हातपाय धरायचं?..वीट आल्लाय आम्हास या फुटाफुटीच्या राजकारणाचा.”…मनाशीच पुटपुटत राजांनी कस्संबस्सं डोळं उघडलं.
“गुड्डमॉर्निंग, डॅड्डीडुड्डी!..उठावं आत्ता. अख्खे आठ वाजलेत. सूर्यनारायण बघ्घा कध्धीचा काळ्याकुट्ट ढगांतून डोक्कावतोय!”
(राजे डोळे वटारून) “”आमच्या सक्काळचं वल्ल खोबरं केलंत; आत्ता अख्खा दिवसही खराब. उरलेसुरलेही आज आमचा हात सोडून जाणार वाटतं. ते नाव जरी कानावर पडलं तरी आमच्या उरात टाळ-चिपळ्या वाजतात हे ठाऊक नाही का तुम्हाला?..नुस्तं सूर्य म्हणलं असतं तरी वाक्य पूर्ण जहाल नस्तं का?”
“सॉर्री, सॉर्री डॅड्डु!..तुमचं आपलं उठता-बसता राजकारण. अहो, मामु (माजी मुख्यमंत्री) नुस्तं त्येच करत बसलात तर वरबाप कध्धी व्हणारात?..कुठ्ठुन कुठ्ठुन स्थळं येत्यात; पण तुम्ही मन्नावरच घिईनात. अख्ख्या राज्यात कुठ्ठंही गेलं तरी मुंडवळ्या कध्धी बांधणार? अस्संच ज्यो त्यो आम्हास पुसतो! मागल्या अधिवेशनात तर अख्खा एक दिवस आमच्या लग्नावरच चर्चा जहाली. इंद्रकाकांनी तर मुलगी बघण्याचं प्रॉमिसही दिलं; पण त्येही एका अटीवर. ती म्हंजे त्यांच्या पक्षात यायचं.”
…बाळराजांचा शेवटच्या वाक्यानं राजं घटकाभर कावरंबावरंच जहालं. मुखकमलावर कसनुसं भाव आणत ते त्राग्यानं बरसले, “”नोहे नोहे, ह्ये कदापि ना होणे.”
राजांच्या त्या महाकाली अवतारानं बाळराजांना पायाखालची जमीनच हातभर सरकल्याचा भास जहाला. त्यांची बोलतीच बंद जहाली. म्हंजे डॅडला आपले हात पिवळे कर्रायचेच नाहीत का?..अशा प्रश्नार्थक मुद्रेने त्ये सुंभासारखे उभे राहिले.
राजांच्या आवाजाची पट्टी आता आणखी वर चढली. “”काय, इंद्रभाऊंची ही मजाल? पळवापळवी आत्ता बस्स जहाली म्हणावं. पक्ष फोडलात, आत्ता घर फोडायला निघालात काय?”
राजांची गाडी दुसरीकडं वळलेय, हे ऐकून बाळराजांचा जीव भांड्यात पडला.
बाळराजांचा हात हातात घेत, राजे काकुळतीनं म्हणालं, “”बाळराजं, चिंता सोडा. व्हणार, तुमचं लगीन व्हणार. तेही याच पावसाळ्यात. त्येही जलधारांच्या साक्षीनं. आत्ता तस्संही आम्हास काय काम उरलेलं नाही. अंघोळ करतो आणि लग्गेच वधुसंशोधनाला सुर्रुवात करतो.”
त्यावर बाळराजं जाम खूश जहालं. “”थॅंकू थॅंकू डॅड्डु” म्हणत ढिंगच्यांग डिच्यांगऽऽचा सूर आळवतच त्यांनी पुन्हा बेडरूम गाठली.