T20 WorldCup – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. त्यामुळे रोहित शर्माने यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी विशेष तयारी केली असणार आहे. त्याचबरोबर आता रोहितच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा असल्याने त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सामन्यात भारतीय सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करून देण्यास यशस्वी राहिले तर भारताला सामना जिंकण्याची जास्त संधी असणार आहे.
#T20WorldCup | न्यूझीलंडची गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ८९ धावांनी मात
भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या जात नाहीत. त्यामुळे हे दोन्ही देश फक्त आशिया चषक किंवा आयसीसी विश्वचषक स्पर्धेदरम्यान एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळतात. त्याप्रमाणे रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध जास्त टी-२० सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु आतापर्यंत या संघाविरुद्ध खेळलेल्या सर्व टी-२० सामन्यांमध्ये रोहितला काही खास कामगिरी करता आलेली नाही. ( T20 WorldCup )
भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध १० टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये रोहितने ९ डावात १५.७१ च्या सरासरीने केवळ ११० धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ३० अशी राहिली आहे. महत्वाचं म्हणजे पाकिस्तान संघाविरुद्ध त्याला अर्धशतकही झळकावता आलेले नाही. रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध ९ डावात दोनदा शून्यावर बाद झालेला आहे.
रोहित शर्मा कर्णधार म्हणून टी-२० विश्वचषकात ( T20 WorldCup ) पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या विश्वचषकातील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. यावेळी रोहित सेना गेल्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाली आहे. मेलबर्न येथे हा सामना होणार असल्याने पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.