नगर – जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिव्यक्ती 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी 830 योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी 225 योजना पूर्ण झाल्या असून त्याची यशस्वी चाचणी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी झाली. या योजनांमुळे 240 गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद यंत्रणामार्फत जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 927 गावात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे हर घर, नल से जल.. उपक्रम यशस्वी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. डिसेंबर 2023 अखेर सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. या योजनेमुळे मुधोळवाडी, नवसारवाडी, आवटेवाडी व नेटकेवाडी ही गावे टॅंकरमुक्त झाली.
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना
जामखेड 20, कर्जत 21, नगर 17, नेवासे 12, राहुरी 24, शेवगाव 15, पाथर्डी 16, श्रीगोंदा 20, पारनेर 10, श्रीरामपूर 13, कोपरगाव 20, संगमनेर 23, राहता 6, अकोले 8.जिल्ह्यातील 225 योजनांची यशस्वी चाचणी झाली आहे. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील योजना उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे योजनांबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या पाठवाव्यात त्याची दखल घेतली जाईल.