नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलनू ते प्रधानमंत्री संग्रहालय असे केले आहे. परवा 14 तारखेपासून हे नवे नाव अस्तित्वात आले आहे. केंद्र सरकारची नेहरूंचे नाव बदलण्याची ही कृती अत्यंत लाजिरवाणी आहे अशी टीका आम आदमी पक्षाच्यावतीने दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केली आहे. यातून केंद्र सरकारचे “क्षुद्र राजकारण” दिसून आले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या या कृतीबद्दल पीटीआयशी बोलताना भारद्वाज म्हणाले की, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्यांचा अनादर करणे हिंदू संस्कृतीत आणि आपल्या संस्कृतीत बसत नाही. जवाहरलाल नेहरू हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते. ते स्वातंत्र्यसैनिक होते. देशाच्या एकूणच उभारणीत त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
दिल्लीतील पंडित नेहरुंच्या तीन मुर्ती भवन या अधिकृत निवासस्थानी हे नेहरुंच्या नावाने संग्रहालय उभारण्यात आले होते. ते आता पंतप्रधान संग्रहालय करण्यात आले असून त्यात देशाच्या अन्य पंतप्रधानांच्या कार्याचीहीं माहिती सादर करण्यात आली आहे.