हिंगोली (शिवशंकर निरगुडे,प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी येथील ऊसतोड कामगाराच्या मुलींनी यशस्वी झेप घेतली आहे. आई-वडील सहा-सहा महिने घराच्या बाहेर राहून मुलींना शिकण्यासाठी अहोरात्र मेहनत करत होते. मुलींनीही अभ्यासात सातत्य ठेवले. आता एक मुलगी सिव्हिल इंजिनिअर झाली असून, दोन मुली एमबीबीएससाठी पात्र ठरून शिक्षण घेत आहेत. ऊसतोड कामगाराच्या मुलीने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात स्वतःबरोबरच आई-वडिलांचे नाव उज्वल करून एक ठसा उमटवला आहे.
कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी येथील साहेबराव भुरके यांना शिक्षणाचे पाढेही येत नाहीत. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तरुण वयापासूनच साहेबराव व त्यांची पत्नी हे ऊसतोड कामगार आहेत. ऊस तोडण्यासाठी ते वर्षातून सहा महिने घराबाहेर राहायचे. अहोरात्र मेहनत करायचे. परंतु, मनाशी एकच ध्येय होते. आपल्यावर जी वेळ आली, ती आपल्या मुलींना व मुलावर येऊ नये. साहेबराव भुरके यांनी मुलगा अन् मुलगी यांच्यात कधीही भेदभाव केला नाही.
परिस्थिती हलाखीची असली तरी मुलींच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होवू दिला नाही. त्यांनी मुलींना बाळापूर, नांदेड येथे शिक्षणासाठी ठेवले. मुलींनीही आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करीत मोठी मुलगी राणी साहेबराव भुरके हिने नांदेड येथीलच एमजीएम महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअर केले असून, ती सिव्हिल अभियंता झाली.
कष्टाला आलं फळ…
कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी हे पाचशे लोकसंख्येचे आदिवासी बहुल गाव आहे. या गावातील बहुतांश कुटुंबीय दरवर्षी ऊसतोड कामानिमित्ताने बाहेरगावी जातात. यातीलच एक साहेबराव भुरके यांचे कुटुंबीय आहे. साहेबराव भुरके म्हणाले, माझ्या व पत्नीच्या कष्टाला फळं आलं आहे. एक मुलगी सिव्हिल इंजिनिअर झाली असून, उर्वरित दोन मुली एमबीबीएस डॉक्टर होतील, याचा आम्हाला खूप आनंद आहे.
दुसरी मुलगी मोनिका ही २०२०-२१ यावर्षी नांदेड येथील एमबीबीएस मेडिकल कॉलेजला पात्र ठरून मेडिकलचे शिक्षण घेत आहे. तर, तिसरी मुलगी सोनम ही २०२२-२३ या वर्षाकरिता लातूर येथील एमबीबीएस महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरली आहे. तर, मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे.