पुणे – महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहून प्रभू रामचंद्रांचा व महर्षी व्यासांनी महाभारत लिहून भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांचा इतिहास जगासमोर आणला; तसेच आम्हाला स्वराज्यासाठी पराक्रम गाजवणाऱ्या आणि बलीदान देणाऱ्या आपल्या अज्ञात पूर्वजांचा अज्ञात इतिहास जगासमोर आणावा लागेल, असे मत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी मांडले.
सप्त सहस्त्री सरदार नावजी बलकवडे यांच्या 330व्या विजयोत्सवाचे औचित्य साधून सिंहगडच्या पायथ्याशी त्यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सुभेदार नावजी बलकवडे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे गावात पतंजली आत्मबोध केंद्राच्या परिसरात अविनाश बलकवडे यांच्या खासगी जागेत एका भव्य मेघडंबरीत नावजींच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवकालीन सरदारांचे वंशज विक्रम सिंह मोहिते, कुणाल मालुसरे, रवींद्र कंक, अमित गायकवाड, मंगेश शिळीमकर, नारायणराव शितोळे, लक्ष्मणराव निवंगुणे, उमेशराव कारके, बाळासाहेब ढमढेरे, राजाभाऊ ढमढेरे, प्रदीप मरळ, अशोक सरपाटील, दिलीप पायगुडे, शंकर पायगुडे, बाळासाहेब पायगुडे, मनोज पायगुडे, सुधीर थोरात, दत्ता जोरकर, प्रमोद चव्हाण पंचायत समितीचे सदस्य नवनाथ पारगे आणि योगेश भामे उपस्थित होते.
पूर्वजांची स्मारके बांधण्यासाठी सरकारी निधीवर व जागेवर अवलंबून न राहता त्या घराण्यातील वंशजांनी एकत्र येऊन बलकवडे कुटुंबियांप्रमाणे स्मारके उभारावीत, असे आवाहन विक्रमसिंह मोहिते यांनी केले. या स्मारकाच्या उभारणीमध्ये सुचिता अविनाश बलकवडे, संभाजी बलकवडे, देवदत्त बलकवडे, राजेंद्र बलकवडे, अविनाश बलकवडे, नरेश बलकवडे, दिलीप बलकवडे, भगवान बलकवडे आदी त्यांच्या वंशजांनी योगदान दिले आहे.