Keshav Maharaj Eager IND vs SA Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे, तर दुसरी सामना गुवाहाटी येथे होणाप आहे. या मालिकेपूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा मुख्य फिरकीपटू केशव महाराजने एक महत्त्वाचे विधान केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेला भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी आपला संघ अत्यंत उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे. भारताचा दौरा सर्वात कठीण – केशव महाराज ऑनलाइन संवादात बोलताना महाराज म्हणाला, “आमचा संघ भारताला त्यांच्याच मायभूमीत हरवण्यासाठी खरोखरच उत्सुक आहे. हा दौरा कदाचित आमच्यासाठी सर्वात कठीण दौऱ्यांपैकी एक आहे. ही आमच्यासाठी सर्वात मोठी परीक्षा असेल, असे आम्हाला वाटते. यातून आम्हाला स्वतःचे आकलन करण्याची आणि आमचे वास्तविक स्थान काय आहे, हे जाणून घेण्याची एक उत्तम संधी मिळेल.” महाराजने सांगितले की, “आम्ही उपखंडातील इतर भागांमध्ये (पाकिस्तानमध्ये) विजय मिळवण्यास सुरुवात केली आहे. आता भारतातही विजय मिळवण्यासाठी आमच्या संघात तीव्र भूक आणि इच्छा आहे.” दक्षिण आफ्रिकेने अलिकडच्या वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्यांना भारतात झालेल्या त्यांच्या मागील दोन मालिकांमध्ये (२०१५ आणि २०१९ मध्ये) यश मिळाले नाही. हेही वाचा – ICC ODI Rankings : आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर! विराट कोहलीने न खेळताच बाबर आझमला टाकलं मागे फिरकीसाठी अनुकूल खेळपट्ट्यांची अपेक्षा नाही – केशव महाराजला असे वाटते की, या मालिकेतील खेळपट्ट्या अलीकडे पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाल्या त्याप्रमाणे फिरकीपटूंसाठी जास्त अनुकूल नसतील. पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी हरल्यानंतर आपल्या फिरकीपटूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मालिका बरोबरीत आणली होती. महाराज पुढे म्हणाला, “मला वाटत नाही की येथील परिस्थिती आम्ही पाकिस्तानमध्ये पाहिली त्याप्रमाणे फिरकीपटूंसाठी अनुकूल असेल. मला वाटते की विकेट्स चांगल्या असतील आणि खेळ पुढे सरकेल तसा फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळेल. आम्हाला दिसतेय की भारताला कदाचित पारंपारिक कसोटी खेळपट्ट्या जास्त आवडतील.” दृष्टिकोन बदलत आहे – खेळपट्ट्यांच्या दृष्टिकोनात बदल होत असल्याचे महाराजचे मत आहे. तो म्हणाला, “तुम्ही वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील मालिका पाहिली असेल, तर तुम्हाला समजेल की त्या मालिकेसाठी चांगल्या खेळपट्टी तयार केल्या गेल्या होत्या. तसेच सामने चौथ्या आणि पाचव्या दिवसांपर्यंत चालले. त्यामुळे माझा विश्वास आहे की विकेट्सच्या बाबतीत दृष्टिकोन बदलत आहे.” हेही वाचा – IND vs SA : तब्बल ३८ वर्षांनंतर टीम इंडियात ऐतिहासिक बदल! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’ कोणतीही कसर सोडणार नाही – केशव महाराज पुढे म्हणाला, “भारतीय संघ उत्कृष्ट आहे आणि त्यांनी बदलाच्या टप्प्यात चांगली प्रगती केली आहे. आम्ही वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान पाहिल्याप्रमाणे त्यांना चांगल्या खेळपट्टीवर खेळायला आवडेल. आम्ही पाकिस्तानमध्ये दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. आम्ही तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. नाणेफेकीचा निकाल काहीही असो, सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लावण्यासाठी कोणतीही कसर आम्ही सोडणार नाही.”