– अरुण गोखले
संताचा प्रत्येक शब्द हा मोलाचा असतो. त्याची त्यांनी अचूक निवड आणि मांडणी केलेली असते. संत ज्ञानदेवाच्या हरिपाठातील पहिल्याच अभंगाचे हे पहिले चरण आपल्याला काय आणि कोणती साधना उपासना सांगते ते पाहा. महाराज सांगतात की, बाबा रे, तू काय कर! तर तू देवाच्या दारात उभा राहा. पण तिथे त्या देवाचे दारी उभा राहून तू काय करशील तर- देवचिये द्वारी। उभा क्षणभरी।।
महाराज आपल्याला उभं राहायला सांगतात. पण ते कुठे? तर देवाच्या द्वारी. तेव्हा देव म्हणजे नेमका काय? हे आपण पहिल्यांदा जाणून घ्यायला हवे. देव ही एक मानवी मनातील संकल्पना आहे. जे सात्विक आहे, सुंदर आहे, जो देतो, जो आपल्या हाकेला धावून येतो, जो आपल्याला संकटातून सोडवतो, तो देव.
व्यक्तीच्या भाव, श्रद्धा आणि त्याच्या आवडीप्रमाणे त्याचा देव, उपास्य दैवत हे वेगवेगळे असते. कोणी रामाची भक्ती करते, तर कोणी कृष्णाची. कोणी विठ्ठलाची, विष्णूची किंवा शंकराची इत्यादी ही देवांची नावे, रूपे जरी भिन्न भिन्न असली तरी सुद्धा त्या मागची देवत्वाची संकल्पना ही एकच असते.
महाराज सांगतात की, तुम्ही तुमच्या देवाच्या दारात उभे राहा. ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही देवाच्या दारात उभे राहा, असे जे सांगायचे आहे त्या मागचा खरा अर्थ हा आहे की, तुम्ही नित्य कोणत्या ना कोणत्या तरी ईश्वरोपासनेच्या मार्गाचे आचरक व्हा. ती साधना, तो अभ्यास करा.
अर्थात, कोणीही भक्त, साधक, उपासक हा कोणत्याही देव द्वारी जरी उभा असला तरी तो कसा उभा असायला हवा? त्याने काय करायला हवे? ते महाराज पुढे सांगतात, त्याने त्या देवाच्या द्वारात उभे राहायचे आणि काय करायचे तर- उभा क्षणभरी।। इथला रचनात्मक शब्द जो आहे तो आहे “क्षणभरी’. पण या क्षणभरी म्हणजे त्याच्या शब्दार्था इतके म्हणजेच निमिषभर,
निमिष मात्र असा त्याचा अर्थ अभिप्रेत नाही, तर प्रत्येक क्षण हा त्या हरीच्या नामाने, त्याच्या दर्शनाने, त्याच्या ध्यानाने आणि अनुसंधानाने भरून घेत, त्या जीवनातला प्रत्येक क्षणाची सार्थकता करीत असा त्या मागचा व्यापक गुढार्थ आहे. क्षणभरी नाही तर क्षण भरीत असे महाराजांना म्हणायचे आहे.