Snake Mating Season – उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने तापमानातील बदलामुळे सापांचे बाहेर पडणे वाढले आहे. त्यातच नाग व धामण यांसारख्या सापांचा मिलनकाल सुरू झाल्याने दोन किंवा अधिक साप एकत्र दिसण्याचे प्रकार वाढले असून सर्पदंशाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकर्यांनी शेतात काम करताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. साप हा जमिनीवर सरपटणारा प्राणी असून उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वाढत असल्याने गारव्याच्या तसेच भक्षाच्या शोधात साप बाहेर पडतात. सध्या काही सापांचा मिलनकाल सुरू असल्याने परिसरात दोनपेक्षा अधिक साप दिसण्याच्या घटना घडत आहेत. उष्णतेमुळे सापांची हालचाल वाढलेली असल्याने ते चिडलेल्या अवस्थेत असू शकतात, त्यामुळे सर्पदंश होण्याची शक्यता वाढते. म्हणून नागरिकांनी व शेतकर्यांनी शेतात किंवा मोकळ्या जागी काम करताना काळजी घेणे आवश्यक आहे. परिसरात आढळणारे सर्व साप विषारी नसतात. फक्त फुरसे, घोणस, नाग, मण्यार आणि पोवळा हे साप विषारी आहेत. कोणाला सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेणे गरजेचे आहे. तसेच परिसरात साप आढळल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित अंतर राखून वनविभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, उपाध्यक्ष अभिजित वाघमारे, सचिव अमर गोडांबे, सुरज वाघमारे तसेच नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गणेश टिळेकर, वैभव निकाळजे व बाळासाहेब मोरे यांनी सांगितले. सर्पदंश झाल्यास तातडीने उपचार आवश्यक उन्हाळ्यात सापांचे विष काही प्रमाणात पातळ झाल्याने सर्पदंश झाल्यास विष शरीरात जलद गतीने पसरू शकते. त्यामुळे सर्पदंशाची घटना घडल्यास घाबरून न जाता जखमी व्यक्तीला तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम यांनी दिला आहे.